रितेश देशमुखचं स्तुत्य पाऊल, जलयुक्त लातूरसाठी निधी
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर | 23 Apr 2016 07:55 AM (IST)
लातूर : दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या कलाकारांच्या यादीत आणखी एका अभिनेत्याची भर पडली. कौतुकास्पद बाब म्हणजे बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने हे पाऊल उचललं आहे. रितेश देशमुखने जलयुक्त लातूरसाठी 25 लाखांचा निधी दिला आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या या लेकाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लातूरकरांसाठी मदतीचा हात दिला आहे. राज्यातील दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी अभिनेता आमीर खान आणि लेखक- दिग्दर्शक सत्यजीत भटकळ यांनी पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीने ‘पाणी फाऊंडेशन’मार्फत राज्यभरात गावागावात जाऊन जलसंधारणाची कामं करण्यात येत आहेत. आमीर – सत्यजीतची या कामांसाठी भन्नाट कल्पना आहे. ‘पाणी फाऊंडेशन’ने ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘पाणी फाऊंडेशन’च्या या उपक्रमाशी सचिन तेंडुलकर, रतन टाटा यासारख्यांचाही सहभाग आहे.