मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला मागील अनेक वर्षांपासून मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या हानीकारक रेडिएशनविरोधात नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत तिने न्यायालयाचं दारही ठोठावलं आहे. जुही चावलाने आता भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून आज त्यावर सुनावणी होणार आहे.


जुही चावलाने दाखल केलेल्या या याचिकेत मागणी केली आहे की, "5G टेक्नॉलॉजी लागू करण्याआधी याच्याशी संबंधित सर्व संशोधनावर बारकाईने विचार करुन त्यानंतरच ही टेक्नॉलॉजी भारतात लागू करावी." जुही चावलाने आपल्या या याचिकेत भारताच्या दूरसंचार मंत्रालयाला आवाहन केलं आहे की, "5G टेक्नॉलॉजी लागू केल्यास सामान्य जनता, जिवाणू, झाडं-झुडपं आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांशी संबंधित संशोधनाचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्यांच्या अहवालाच्या आधारावर ती भारतात लागू करायची की नाही याबाबत निर्णय घ्यावा."


जुही चावलाने एबीपी न्यूजला सांगितलं की, "आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू करण्याच्याविरोधात नाही. उलट यामधून निर्माण होणाऱ्या नवनव्या उत्पादनांचा आपण लाभही घेतो, ज्यात वायरलेस कम्युनिकेशनचाही समावेश आहे. परंतु या उपकरणांच्या वापराबाबत आपण आजही गोंधळाच्या स्थितीत आहोत. कारण वायरफ्री गॅजेट्स आणि नेटवर्क सेल टॉवर्सशी संबंधित आपल्याच संशोधनातून हे स्पष्ट होतं की अशाप्रकारचे रेडिएशन नागरिकांच्या आरोग्य आणि त्यांच्या सुरक्षेसाठी अतिशय हानीकारक आहेत.


"भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याआधी RF रेडिएशनमुळे महिला, पुरुष, वृद्ध, लहान मुलं, बालकं, जनावरं, जीव-जंतू, झाडं-झुडपं आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा योग्यरित्या संशोधन केलं जावं. झालेल्या किंवा होणाऱ्या संशोधनाचा अहवाल सार्वजनिक केला जावा.  "5G टेक्नॉलॉजी भारताच्या सध्याच्या नागरिकांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी सुरक्षित आहे की नाही हे या संशोधनानंतर स्पष्ट केलं जावं. त्यानंतच ही टेक्नॉलॉजी लागू करण्याबाबत विचार करावा," असं जुही चावलच्या एका प्रवक्त्याने अधिकृत वक्तव्यात स्पष्ट केलं