मुंबई : प्रसिद्ध चित्रपट अभिनेते दलिप ताहील यांना अटक करण्यात आली. मद्यधुंद अवस्थेत कार चालवून ताहिल यांनी रिक्षाला धडक दिल्याचा आरोप आहे. मुंबईतील खार पोलिसांनी ताहिल यांना बेड्या ठोकल्या, मात्र त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. जेनिता गांधी आपल्या मित्रासोबत रिक्षाने जात असताना दलिप ताहिल यांच्या गाडीने त्यांना धडक दिल्याचा आरोप आहे. अपघातानंतर दलिप ताहिल यांनी घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत अडकल्यामुळे ते पकडले गेले. 'धडक दिल्यावर आम्ही रिक्षातून उतरलो, तेव्हा कार दलिप ताहील चालवत असल्याचं आमच्या लक्षात आलं. आम्ही गाडीचा नंबर लिहून घेतला. ताहिल यांनी गाडीबाहेर येऊन वाद घालायला सुरुवात केली आणि माझ्या मित्राला धक्काबुक्की केली.' असं जेनिता गांधींनी जबानीत लिहिलं आहे. मद्याच्या अंमलाखाली बेदरकारपणे गाडी चालवून इतरांना जखमी केल्याप्रकरणी दलिप ताहिल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दलिप ताहिल यांनी भाग मिल्खा भाग, रा.वन, लूट, रॉक ऑन, रेस, तलाश, फिर भी दिल है हिंदुस्तानी, कहो ना प्यार है, गुप्त, जुडवा, इष्क, मन, गुलाम अशा असंख्य चित्रपटात भूमिका केल्या आहेत.