अक्षय कुमारकडून यवतमाळमधील आत्महत्याग्रस्त गाव दत्तक
एबीपी माझा वेब टीम | 06 Nov 2016 11:32 AM (IST)
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आता शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे. यवतमाळमधील पिंपरी बुटी गाव दत्तक घेत त्याने शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. ऑक्टोबरमध्ये अक्षय कुमारनं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली होती. ज्या गावांमध्ये शेतकरी आत्महत्यांच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत, ते गाव अक्षय दत्तक घेण्याची इच्छाही त्यानं व्यक्त केली होती. त्यानुसार राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला सर्वाधिक आत्महत्या झालेलं गाव सुचवण्यास सांगितलं होतं. प्रशासनाकडून पिंपरी बुटी गावचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी जाईल. त्यानंतर अक्षयला गाव दत्तक घेण्यास परवानगी देण्यात येईल. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबतच अक्षय कुमार कलाकार आपले सामाजिक भानही जपत आहे. यामुळे सर्वच स्तरातून अक्षयवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.