एटीएसची कारवाई चुकीची : अबू आझमी
एबीपी माझा वेब टीम | 25 Jul 2016 11:33 AM (IST)
मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी एटीएसला टार्गेट केलं आहे. एटीएस चुकीची कारवाई करत असल्याचा आरोप आझमी यांनी केला आहे. मराठवाड्यातून गेल्या काही दिवसात 100 तरुण बेपत्ता झाले आहेत. या प्रकरणी बोलताना आज अबू आझमी यांनी आपली भूमिका मांडली आहे. देशातील 30 कोटी मुस्लिमांचा प्रश्न आहे. मुस्लिमांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. काहीजण याचं राजकारण करत आहेत. मराठवाड्यातून जर 100 तरुण बेपत्ता असतील तर पोलिसांनी त्यांचा शोध घ्यावा. कोणी तक्रार केली, कुटुंबीयांनी चौकशी केली का, याचा तपास करावा, असं आझमी म्हणाले. पोलीस पुरावे नसताना कारवाई करत आहेत. ही मुलं निर्दोष सुटली तर संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी आझमी यांनी केली. एटीएस चुकीची कारवाई करत आहे. मालेगाव स्फोटात काय झालं?, हे सगळ्यांनाच माहित असल्याचं आझमींनी सांगितलं. तसंच आरएसएस, भाजपा आणि शिवसेना हिंदू-मुस्लिम ऐक्य बिघडवत आहेत. उद्धव ठाकरे देशाला हिंदूराष्ट्र बनवा, असं म्हणाले. मात्र यामुळे समाजात द्वेष पसरत आहे, असं म्हणत आझमींनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.