मुंबई: सरोगेट मदरच्या माध्यमातून पिता बनलेल्या करण जोहरवर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी टीका केली आहे. ‘करण जोहरला कोणतीही चांगली मुलगी मिळाली असती, त्यानं लग्न करायला हवं होतं. जर लग्न करु शकत नसेल काही आजार असेल त्याबाबत सांगायला हवं होतं. तसं असेल तर त्याने मुलांना दत्तक घ्यायला हवं होतं. पण सरोगसी करण्याचं काय कारण होतं? ’ असा सल्लाही त्यांनी करण जोहरला दिला.


दरम्यान, सरोगसीच्या मदतीने करणला एक मुलगा आणि एक मुलगी अशी जुळी अपत्यप्राप्ती झाली आहे. सरोगसीद्वारे सिंगल पेरेंट होणारा करण हा नजीकच्या काळातला दुसरा सेलिब्रेटी ठरला आहे.

करणने आपल्या मुलीचं ‘रुही’, तर मुलाचं ‘यश’ असं नामकरण केलं आहे. करणचे वडील आणि दिवंगत निर्माते यश जोहर यांच्या नावावरुन यश, तर आई हिरु जोहर यांच्या नावातील अक्षरांवरुन रुही हे नाव ठेवण्यात आलं आहे.

मुंबईच्या अंधेरी भागातील मसरानी रुग्णालयात 7 फेब्रुवारीला या दोन बाळांचा जन्म झाल्याची माहिती आहे. मात्र, महिन्याभरापासून जोहर कुटुंबाने ही गोष्ट उघड केली नाही. वडील म्हणून करणच्या नावाची नोंदणी करण्यात आली असून आईच्या नावाचा उल्लेख नाही.

करण जोहरने यापूर्वी अनेक वेळा पिता होण्याची इच्छा जाहीर केली होती. त्यामुळे करण लग्न करणार असल्याची अटकळ बॉलिवूडसह तमाम चाहत्यांनी बांधली होती.

संबंधित बातम्या:

करण जोहरला सरोगसीच्या माध्यमातून जुळी मुलं