मुंबई: अमिताभ आणि जया बच्चन यांचा 'अभिमान' चित्रपट सर्वांनाच माहित असेल. मात्र रिल लाईफची ती कहाणी अभिषेक आणि ऐश्वर्याच्या रियल लाईफमध्ये घडते आहे का?, असा सवाल उपस्थित केला जातो आहे.


 

80च्या दशकात पडद्यावर आलेला अभिमान चित्रपट चांगलाच गाजला. प्रेक्षकांना जेवढी चित्रपटाची गाणी आवडली, तेवढंच कथानकही भावलं. चित्रपटाची नायिका म्हणजेच जया बच्चन गायिका म्हणून रातोरात प्रसिद्धी झोतात येते आणि त्यामुळं नायिकेचा पती, म्हणजेच अमिताभच्या कारकिर्दीला उतरती कळा लागते.

 

मात्र या चढाओढीमुळं दोघांच्या नात्यामध्ये मत्सर निर्माण होतो. ही होती अभिमान चित्रपटाची स्टोरी. मात्र, अमिताभ आणि जया यांनी पडद्यावर साकारलेली ही कथा, अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात तर घडत नाही ना? अशी शंका उपस्थित केली जाते आहे. आणि शंकेची ही पाल चुकचुकण्यामागचं कारण म्हणजे सरबजीतच्या प्रिमियरवेळी घडलेला हा प्रसंग

 

काय घडलं नेमकं?

 

सरबजीतच्या प्रिमियरसाठी संपूर्ण बच्चन कुटुंब रेड कार्पेटवर अवतरलं होतं. अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांना एकत्र टिपण्यासाठी फोटोग्राफर्सची एकच झुबंड उडाली होती.

 

बच्चन कुटुंबाचं फोटोसेशन झाल्यानंतर फोटोग्राफर्सनी अभिषेक आणि ऐश्वर्याला फोटोसाठी पोझ देण्याचा आग्रह धरला. अभिषेक बच्चन तयार तर झाला. मात्र, त्याच्या चेहऱ्यावरची भावमुद्रा बरंच काही सांगून गेली.

 

हसतमुख ऐश्वर्याच्या कमरेत हात घालून उभ्या असलेल्या अभिषेक बच्चनच्या चेहऱ्यावरची रेघही हलत नव्हती. ऐश्वर्या फोटोग्राफर्सना प्रतिसाद देत होती. मात्र, अभिषेक चेहऱ्यावर वैतागलेली भावमुद्रा घेऊन उभा होता.

 

आता तुम्ही फक्त ऐश्वर्याचे फोटो काढा, या अनुषंगाचे हातवारे करून अभिषेकनं फोटोग्राफर्सचा निरोप घेतला. अभिषेकच्या अशा जाण्यानं ऐश्वर्या देखील चांगलीच अपसेट झाली.

 

सध्या अभिषेकच्या करियरचा बॅड पॅच सुरू आहे. तर ऐश्वर्याकडे त्यामानानं बऱ्यापैकी प्रोजक्टस आहेत. त्यामुळं अभिषेक आणि ऐश्वर्याच्या आयुष्यात अभिमानच्या अंकाला तर सुरूवात झाली नाही ना? असा सवाल चाहत्यांना सतावतो आहे.