मुंबई : पक्षाने जबाबदारी द्यावी, माझ्याकडे स्किल आहे, बारामती जिंकून दाखवेल, असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. मंत्री गिरीश महाजन एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेला आले होते. त्यावेळी ते बोलत होते. महाजन म्हणाले की, आज अशक्य काहीच नाही. कुणाची मक्तेदारी कुठेच नाही. आम्ही ज्या ठिकाणी काहीच नव्हतो त्या ठिकाणी सत्ता प्राप्त केली आहे, असेही महाजन म्हणाले.


Election Special | जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी विशेष चर्चा | तोंडी परीक्षा | एबीपी माझा



अनेक नेत्यांची आयात भाजपमध्ये केल्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की,  लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. केंद्र आणि राज्य सरकारवर विश्वास आहे. अनेक ठिकाणी आमच्याकडे काही नसतानाही जागा आता वाढल्या. नगरची जबाबदारी माझ्याकडे नव्हती. नगर माझ्याकडे असते तर 50 नगरसेवक आले असते. लोकांना विकास हवाय. त्यामुळे तिथेही आमचा महापौर बसला, असेही ते म्हणाले.

सावधान... आता मुलंच नाही तर नातवंडही पळवू, गिरीश महाजनांचा गर्भित इशारा

लोकसभेच्या निवडणुकीचा रोमांच शिगेला जात असताना नेत्यांची पळवापळवी सुरु आहे. यावरुन भाजपवर 'मुलं पळविणारी टोळी' असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. यावर आता मुलंच नाही तर नातवंडही पळवू, असा इशाराच गिरीश महाजनांनी दिला आहे. भाजपचे संकटमोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेला आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

'मुलं पळविणारी टोळी' असा आरोप केला जात असल्यासंदर्भात प्रश्न विचारला असता गिरीश महाजन म्हणाले की, आता मुलंच नाही तर नातवंडही पळवणार आहोत. त्यांची मुलं नातवंडे ते सांभाळू शकत नाहीत का? असा प्रश्न करत विरोधकांनी आत्मपरिक्षण करावं असा सल्लाही त्यांनी दिला. काही पक्षात आमचं घर म्हणजेच आमचा पक्ष असे समीकरण आहे. कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलायचं काम करायचं का? असा टोलाही त्यांनी लगावला.

सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, विखे पाटील यांचा मोठा वारसा आहे. ते मोठे संस्थानिक आहेत. त्यांच्याकडील कुणी आमच्याकडे येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. मात्र केवळ आमच्याकडेच अशी इनकमिंग आहे हे चूक आहे. त्यांच्याकडे धनंजय मुंडे, भास्कर जाधव, नाना पटोले हे आमचेच आहेत, असे गिरीश महाजन यावेळी म्हणाले.

खडसेंनी खूप कष्ट केलंय, त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते : गिरीश महाजन

माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील संबंधांवर अनेकदा चर्चा होते. मात्र आज गिरीश महाजन यांनी खडसे आणि माझे संबंध खूप चांगले असल्याचे सांगत त्यांनी पक्षासाठी खूप कष्ट केलेत. मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे असे सांगितले. खडसे यांच्याशी असलेल्या संबंधाविषयी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, एकनाथराव खडसे सिनियर आहेत. त्यांना अपेक्षा का असू नये. मला नाही वाटत की, त्यांना त्यांच्या अपेक्षेमुळे घरी बसवलं गेलं. पवार साहेब ४ लोकं निवडून आणून अपेक्षा ठेवतात. एकनाथराव खडसे तर मोठे नेते आहेत, असेही ते म्हणाले.

महाजन पुढे म्हणाले की, माझे त्यांचे संबंध चांगले आहेत. आमचे ज्येष्ठ नेते आहेत. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांच्याबाबत असं व्हायला नको होतं. चुकून काही गोष्टी झाल्या.  मात्र  त्यांनी पक्षासाठी खूप कष्ट केलेत. मला त्यामुळं त्यांच्याबाबत सहानुभूती आहे. आम्ही सोबत काम केलं आहे, असे महाजन म्हणाले.

तुम्ही एवढे प्रश्न सोडवले तर खडसेंचा प्रश्न सोडवता आला नाही का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, त्यांचा प्रश्न आता राहिलेलाच नाही. जर प्रश्न राहिलाच नाही तर मग त्यांना मंत्रिमंडळात का घेतले नाही? असे विचारले असता त्यांनीच (खडसेंनी) सांगितले की, शेवटच्या दोन चार महिन्यासाठी नको, पुढच्या टर्मलाच द्या, असे महाजन म्हणाले.

गिरीश महाजन यांच्या परीक्षेतील महत्वाचे मुद्दे

-  मला शायनिंग मारायला आवडत नाही, जबाबदारी 100 टक्के पार पाडतो

- मला हे काम जमत म्हणून जबाबदारी माझ्याकडे येते

- माझ्याविषयी अन्य मंत्र्यांचा मत्सर नाही.

- मला एखाद काम जमलं नाही तर ते दुसऱ्याकडे दिले जाते

- सुदैवाने माझ्याकडून अनेकदा यशस्वी शिष्टाई होते

- माझ्याकडून मुख्यमंत्र्यांनी दिलेलं एकही काम राहिलं नाही, 100 टक्के यशस्वी झालो

- केवळ आंदोलन नव्हे तर बाकीच्या संकटाच्या कामी देखील यशस्वी झालो

- केरळची मदत हे सर्वात मोठं काम. मला अशा प्रकारचं काम करण्याचं समाधान वाटतं .

- मेडिकल कॅम्प करतो, गरिबाला आरोग्यविषयक मदत होते. त्याचं  समाधान लाभतं.

- 15 वर्ष अजित पवारांनी एकही रुपया निधी दिला नाही

- देवेंद्रजी अजूनही वरती जाऊ शकतात, त्यांच्याकडे तेवढी ताकत आहे

- मला अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त मला मिळालं आहे.

- मी जे काम करतोय त्याचं समाधान आहे.

- मी आरोग्य खातं मागितलेलं, पण मला त्यापेक्षी मोठं खातं दिलं.

- देशात नंबर एकच खात माझ्याकडे आहे.

सविस्तर उत्तरे द्या

प्र:- तुमच्याकडे नेमकं कोणतं लॉलीपॉप आहे ज्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुलं तुमच्याकडे येतात?

उत्तर :- आता मुलंच नाही तर नातवंडही पळवणार आहोत. त्यांची मुलं नातवंडे ते सांभाळू शकत नाहीत का? असा प्रश्न करत विरोधकांनी आत्मपरिक्षण करावं असा सल्लाही महाजनांनी  दिला

युती झाल्यानंतरच्या सगळ्या बैठका मातोश्रीवरच का?


उत्तर :- बैठका कुठं होणार हे आम्ही वाटून घेतलं आहे.  पुढची बैठक वर्षावर होणार आहे.

भाजपचं नेमकं लक्ष्य काय? कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्र की कॉंग्रेसयुक्त भाजप?

उत्तर :- लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. म्हणून भाजपामध्ये इनकमिंग होतंय. केंद्र आणि राज्य सरकारवर विश्वास आहे. अनेक ठिकाणी आमच्याकडे काही नसतानाही जागा आता वाढल्या आहेत.

गिरीश महाजन यांना मिळालेले गुण 10 पैकी 8

संदर्भासहित स्पष्टीकरण

1. महाराजा की महाराणी - ( ही चूक होती. 'महाराजा'  आम्ही चूक केली)


2. पिस्तुलगिरी - माझ्याकडे परवाना आहे. गैर नाही. माझ्यावर क्रीमिनल गुन्हा नाही. कुठला प्रसंग कधी येईल हे सांगता येत नाही.  ज्याला गरज आहे त्याला सरकार लायसन्स देते. 

3.मुख्यमंत्र्यांची दैवी शक्ती- त्यांचं काम, आवाका, त्यामुळं दैवी शक्ती.  कुठलाही प्रसंग येऊ द्या, ते डगमगत  नाहीत.

गिरीश महाजन यांना मिळालेले गुण 10 पैकी 7


योग्य पर्याय निवडा

जलसंपदा खातं मिळाल्याचं क्रेडिट कुणाला

अ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ब. नाथाभाऊंच्या अति महत्त्वकांक्षेला

फिटनेस चॅलेंज कुणाला द्याल

अ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ब. नितीन गडकरी

क. अमित शाह

गिरीश महाजन यांना मिळालेले गुण 10 पैकी 8

एका वाक्यात उत्तरे

१. मंत्रिमंडळातील तुमचा स्पर्धक कोण?

माझा स्पर्धक मंत्रिमंडळात कुणीच नाही.

२. बारामती कशी जिंकणार

माझ्याकडे स्किल आहे.

३. नेमकं गाडीतून कोण कुणाला घेऊन जात होतं

सुजय विखेच मला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन होते.

गिरीश महाजन यांना मिळालेले गुण 10 पैकी 7


कोण कोणास म्हणाले

१. “इतरांच्या मुलांचे लाड मी का करु?”

उत्तर- शरद पवार

२. “खडसेंना उद्या पंतप्रधान पण व्हावंसं वाटेल, पण...”

उत्तर- गिरीश महाजन

गिरीश महाजन यांना मिळालेले गुण 10 पैकी 5


गिरीश महाजन यांना मिळालेले एकूण गुण : 50 पैकी 35