मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी 29 एप्रिलला मुंबईत मतदान होत आहे. मात्र या लाँग विकेंडच्या निमित्ताने मुंबईतून बाहेर जाणाऱ्या गाड्यांचे बुकिंग फुल झालं असल्याने मुंबईकर मतदानाचा हक्क बजावणार की लाँग विकेन्डसाठी बाहेरगावी जाणार असा प्रश्न आता निर्माण होत आहे.


लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी पुणेकरांची कामगिरी सर्वात खराब राहिली होती. मुंबईमधील मतदानाची टक्केवारी पुण्याप्रमाणेच असणार नाही ना? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईतल्या 29 तारखेच्या मतदानाला जोडून शनिवार, रविवार, महाराष्ट्र दिन अशा सुट्ट्यादेखील आल्या आहेत. या लाँग विकेंडमुळे बरेच मुंबईकर मुंबईबाहेर जाताना दिसत आहेत. खाजगी ट्रॅव्हल्सचं महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या गाड्यांचं बुकिंग फुल झालं आहे. एस.टी. महामंडळांच्या गाड्यांच्या आरक्षणातही वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकर लाँग विकेंडचा मुहूर्त गाठण्याच्या नादात मतदानाचा मुहूर्त तर चुकवणार नाही ना? ही भीती व्यक्त केली जात आहे.

लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात पुण्यात सर्वात कमी मतदान झालं आहे. राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत पुण्याचा शेवटचा क्रमांक लागतो आहे. पुण्यात सर्वात कमी म्हणजे फक्त 49 टक्केच मतदान झालं. त्यामुळे मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी घसरू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. .मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावं, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मुंबईत विविध स्तरावर उपक्रम राबविले जात आहेत.