मुंबई : "जनमानसात जाऊन त्यांचे प्रश्न, त्यांच्या भावना समजून घेतल्याने निवडणुकीत मोठा प्रतिसाद मिळाला," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वे विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचं वर्णन केलं. विधानसभा निवडणूक निकालानंतर  बारामतीमध्ये पोहोचल्यानंतर शरद पवार एबीपी माझाशी बोलत होते. तसंच शिवसेना आणि भाजपचा सरसकट पक्षांतराचा कार्यक्रम जनतेला पटला नसल्याचंही शरद पवार म्हणाले.


विधानसभा निवडणुकीत महायुतीने 163 जागा मिळवत सत्ता मिळवली खरी पण कालच्या निकालापासून चर्चा सुरु आहेत ती फक्त शरद पवारांची. शरद पवार यांनी लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र पिंजून काढला. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजिवनी मिळाली. शरद पवारांनी हा करिष्मा कसा साधला? राष्ट्रवादीचा भविष्याचा प्लॅन काय आहे. यासह अनेक प्रश्नांची उत्तर शरद पवारांनी दिली.

पक्षांतराचा कार्यक्रम जनतेला पटला नाही
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपची मेगाभरती सुरु होती. मात्र पक्षांतराचा कार्यक्रम जनतेला पटला नसल्याचं शरद पवार म्हणाले. "शिवसेना आणि भाजपचा सरसकट पक्षांतराचा कार्यक्रम जनतेला पसंत पडला नाही. त्यांची नाराजी मतदानाच्या रुपाने होईल याची मला खात्री होती. मोजके लोक सोडले तर बहुतांश जणांचा पराभव झाला. लोकांना पक्षांतर आवडत नाही. 15 वर्ष सत्तेत राहता, काम करता, सत्तेशिवाय पाच वर्ष राहता येत नाही, भूमिकेशी कटिबद्ध राहत नाही, हे जनतेला आवडत नाही, अशा शब्दात पवारांनी पक्ष सोडणाऱ्यांवर टीका केला. तसंच जे गेले त्यांना आमच्या शुभेच्छा, त्यावर जास्त भाष्य करण्याची आवश्यकता नाही. त्याची नोंद सामान्य जनता घेते, त्यात आपण मेहनत घेण्याची गरज नाही, असं पवार म्हणाले.

भाजपला 370चा फायदा झाला, पण शेती, रोजगार महत्त्वाचे विषय
विधानसभा निवडणुकीत भाजप अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेतील महत्त्वाचा मुद्दे हे कलम 370 आणि पुलवामा हल्ला होते. याविषयी विचारला असता शरद पवार म्हणाले की, भाजपला कलम 370 आणि पुलवामा हल्ला याचा फायदा झाला. पण शेती, शेतकरी, शेतकरी आत्महत्या, बंद पडलेले कारखाने, त्यामुळे बुडालेले रोजगार या गोष्टी सामान्यांना महत्त्वाच्या वाटत होत्या. कारण त्या दैनंदिन आयुष्याशी निगडित आहेत. त्याकडे दुर्लक्ष होऊ नये असं त्यांचं मत होतं आणि ते निवडणुकीच्या माध्यमातून समोर आलं.

सत्तेपेक्षा शेती, बेरोजगारीची अधिक चिंता
राज्यासाठी पुढची उत्तम फळी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पवारांनी सांगितलं. सत्तेपेक्षा शेती, राज्यातील उद्योग, बेरोजगारीची अधिक चिंता वाटते. कारखानदारी, तरुणांचे रोजगार टिकवण्यावर भर असेल, असं शरद पवार म्हणाले.

तरुण आमदारांना सल्ला
रोहित पवार यांच्या रुपाने पवार कुटुंबातील तिसरी पीढी विधानसभेत पोहोचली आहे. या तरुण आमदारांना कोणता सल्ला दिला याबाबत विचारलं असता पवार म्हणाले की, "ज्यांना संधी दिलीय त्यांच्याशी प्रामाणिक राहा, विनम्र राहा. तसंच शपथ घ्यायला मुंबईला जाल त्यावेळी मुंबई बघायची आवश्यकता नाही. त्यापेक्षा विधीमंडळाच्या ग्रंथालयात जा. जुनी भाषणं ऐका, पद्धती समजून घ्या आणि सामाजिक संसदपटू कसं होता येईल हे पाहा. राज्यासमोरील प्रश्नांबाबत सतर्क राहा."

कुठला निकाल धक्कादायक
विधानसभा निवडणुकीत काही धक्कादायक निकालही लागले. ज्यात उदयनराजे आणि पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. याबाबत शरद पवार म्हणाले की, "मीडिया साताऱ्याच्या निकालाची चर्चा करतोय, पण मला त्याची 100 टक्के खात्री होती.शिवाय परळीचा निकाल धनंजय मुंडेंच्या बाजूने लागेल यात काही शंका नव्हती. त्यामुळे कुठल्याही निकालाचं आश्चर्य वाटलं नाही."