पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला राहुल गांधींनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. "मोदीजी, लढाई संपली असून तुम्ही केलेलं कर्म तुमची वाट पाहात आहे", असं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे.


पंतप्रधान मोदींनी शनिवारी उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना बोफोर्स घोटाळ्यावरुन राजीव गांधी यांच्यावर टीका केली होती. 'भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात राजीव गांधींचा जीवनप्रवास संपला', असे वक्तव्य मोदींनी केले होते. यावर राहुल गांधींनी मोदींना उत्तर दिले आहे. "मोदीजी, लढाई संपली असून तुम्ही केलेलं कर्म तुमची वाट पाहात आहे. माझ्या वडिलांवर केलेले आरोपही तुम्हाला वाचवू शकणार नाही", असं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे.


काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील मोदींच्या त्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 'शहीदांच्या नावावर मतं मागून त्यांच्या हौतात्म्याचा अपमान करणाऱ्या पंतप्रधानांनी काल आणखी एका स्वच्छ व्यक्तीच्या हौतात्म्याचा अपमान केला आहे. राजीव गांधींनी ज्यांच्यासाठी बलिदान दिले ती जनताच तुम्हाला उत्तर देईल. हा देश फसवणुकीला कधीच माफ करत नाही', असं ट्वीट प्रियंका गांधींनी केलं आहे.