निवडणूक निकाल २०२६
(Source: ECI/ABP News)
मुख्यमंत्र्यांच्या वतीने सहकारमंत्र्यांकडून दानवे-खोतकरांची कट्टी सोडवण्याचा प्रयत्न, जालन्यात दिलजमाई बैठक
एबीपी माझा वेब टीम | 04 Mar 2019 10:53 AM (IST)
जालन्यात अर्जुन खोतकरांच्या घरी दिलजमाई बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या वतीने सहकारमंत्री सुभाष देशमुख मुंबईहून जालन्यात आले होते. त्यानंतर खोतकर, दानवे आणि सुभाष देशमुख यांची बंद दाराआड चर्चा झाली.

जालना : शिवसेना-भाजप युतीनंतर दोन्ही पक्षातील ज्या-ज्या नेत्यांचे रुसवे फुगवे होते, त्यांची कट्टी फू सोडवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या मनधरणीसाठी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मध्यस्थी केल्याची माहिती आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आण अर्जुन खोतकर यांच्यात विस्तव जात नव्हता. जालन्यात अर्जुन खोतकरांच्या घरी ही दिलजमाई बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या वतीने सहकारमंत्री सुभाष देशमुख मुंबईहून जालन्यात आले होते. खोतकर, दानवे आणि सुभाष देशमुख यांची बंद दाराआड तासभर चर्चा झाली. दोघे जण आपापल्या पक्षासाठी काम करत असताना त्यांच्यात संघर्ष झाला होता. युतीनंतर दोघांमधील वाद मिटवण्यात आले आहेत. दोघं आता पक्षासाठी नाही, तर युतीची काम करतील, असं म्हणत चर्चा यशस्वी झाल्याचं सुभाष देशमुखांनी जाहीर केले. VIDEO | दानवे-खोतकर वाद मिटवण्यात यश आल्यचं सुभाष देशमुखांचं वक्तव्य | जालना | एबीपी माझा रावसाहेब दानवे यांनीही दोघांमध्ये सर्व काही अलबेल असून चर्चा यशस्वी झाल्याचं वक्तव्य केलं. दोघांमधील वाद मिटल्याचं दानवेंनी सांगितलं असलं तरी खोतकरांनी मात्र अजून मैदान सोडलेलं नाही. 'सुभाष देशमुख हे मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आले होते. उद्या बैठकीला बोलावलं आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा असेल' असा पुनरुच्चार खोतकरांनी केला. युती होण्यापूर्वीपासूनच अर्जुन खोतकर दानवेंना टक्कर देण्यावर ठाम होते. युती झाली, तरीही शंभर टक्के मी जालन्यातून उभा राहणार आणि विजयीच होणार, असं अर्जुन खोतकरांनी ठणकावून सांगितलं होतं. भाजपची वागणूक खूप क्लेशदायक आहे. त्यांना खूप घमेंड, मस्ती आहे आणि ती मी उतरवणार, असा चंग अर्जुन खोतकरांनी बांधला होता. युतीनंतर ही जागा भाजपला मिळणार आहे. तरीही दानवेंविरोधात मैत्रीपूर्ण निवडणूक लढवण्यावर खोतकर ठाम होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हीच संधी साधून काँग्रेस अर्जुन खोतकर यांना पक्षात घेऊन जालन्यातून उमेदवारी देणार असल्याचं म्हटलं जात होतं. मी कुणालाही भेटलो नाही. काँग्रेसमध्ये जाण्याच्या बातम्यांना काही अर्थ नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेणार असल्याचं स्पष्टीकरण अर्जुन खोतकर यांनी दिलं. उद्धव ठाकरे निर्णय घेतील ते अंतिम राहील. मी ठाकरे घराण्याशी गद्दारी करणार नाही, असंही ते म्हणाले होते.