ABP Cvoter Exit Poll : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024 Result) निकालाचे एक्झिट पोल (Exit Poll) समोर आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या शेवटच्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजील संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. एबीपी सी व्होटरचा सर्व्हेनुसार (ABP Cvoter Exit Poll) राज्यात महायुतीला 48 पैकी 22 ते 26 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर महाविकास आघाडीला 23 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज सांगितला आहे. महायुतीच्या 22 ते 26 जागांपैकी 17 जागा या भाजपला मिळणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे गेल्या वेळच्या तुलनेत यंदा भाजपच्या (BJP) जवळपास सहा जागा घटणार असल्याचं सांगितलं आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सहा जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे.


त्यामुळे महायुतीच्या तीनही पक्षांची एकत्रित संख्या ही 22 ते 26 पर्यंत असून 26 च्या पुढे ती जाणार नसल्याचा अंदाज आहे. एकुणात महायुतील राज्यात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल, अशी शक्यता काही अंशी मावळली आहे. परिणामी, राज्यात महायुतीला अँटी इनकंबंसीचा फटका बसला आणि त्यामुळे महायुतीच्या जागा घटणार. असा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केला आहे. एक्झिट पोलवर प्रतिक्रिया देत असतांना ते बोलत होते. 


महायुतीला अँटी इनकंबंसीचा फटका


एक्झिट पोलचा परिणाम बऱ्यापैकी खरा असतो आणि या पोलचा निष्कर्ष जवळपास खरे देखील ठरतात. हे अंदाज लक्षात घेता असे वाटतं की, राज्यात महायुतीला अँटी इनकंबंसीचा फटका बसला आणि त्यामुळे महायुतीच्या जागा घटणार. अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. जनतेला खासदाराची कामे कदाचित माहीत नाही. त्यामुळे गैरसमजातून अनेक ठिकाणी महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. तर अनेक ठिकाणी बाहेरच्या ठिकाणचे उमेदवार आणि रीपीटेशन मुळेही महायुतीला फटका बसला असल्याचेही संजय गायकवाड म्हणाले.


बुलढाण्यात प्रतापराव जाधव निवडून येण्याची दाट शक्यता आहे. तर रावसाहेब दानवे, प्रतापराव जाधव यांची जास्त टर्म झाल्याने त्यांना फटका बसण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र राज्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार याना मुळीच सहानुभूती मिळाली नाही. आमच्या दोन-चार जागा कमी होणार. मात्र, मला आनंद आहे देशात तिसऱ्यांदा  मोदीजी सत्तेत येत आहेत. असा विश्वासही आमदार संजय गायकवाड यांनी बोलून दाखवला आहे. 


भाजपच्या धोरणामुळे महायुतीला फटका- राधेश्याम चांडक


देशात तिसऱ्यांदा मोदींची सत्ता येत आहे. हे सांगण्यासाठी एक्झिट पोलची गरज नाही. मात्र एनडीए सरकारने शेतकऱ्यांसंबंधी घेतलेल्या निर्णयाचा फटका या सरकारला बसू शकतो. राज्यात तोडफोडीच्या राजकारणामुळे ही भाजप आणि मित्र पक्षांना त्याचा मोठा फटका बसणार असल्याची शक्यता बुलढाणा अर्बन चे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केली आहे. ज्याप्रमाणे राज्यकर्त्यांनी निवडणूक काळात भाषणातून आपली भाषा वापरली तीही आपत्तीजनक होती. त्यामुळे त्याचाही फटका राज्यकर्त्यांना आणि या नेत्यांना बसणार असल्याची शक्यता राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केली. 


इतर महत्वाच्या बातम्या