नागपूर: पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायचे आणि पेशवे फडणवीसांची नेमणूक करायचे. आता फडणवीस छत्रपतींची नेमणूक करतात, अशा प्रकारचं विधान २०१६मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरात केलं होतं. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रपती नामनिर्देशित खासदारकी मिळण्याची या वक्तव्याला पार्श्वभूमी होती. यामुळे मोठा वादंगही झाला होता. मात्र, पवारांच्या अशा विधानामुळे मराठा समाज दुखावला गेला आणि आता तर मराठा समाजासह कोल्हापूर व साताऱ्याचे छत्रपती हेही विकासाच्या मुद्यावर भाजपसोबत येतायत. असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समर्थकांकडून केला जातोय.


संघाशी संबंधित विश्व संवाद केंद्राचे पदाधिकारी सुधीर पाठक यांनी नागपूरमध्ये 'एबीपी माझा'शी बोलताना हा दावा केलाय.  पाठक म्हणाले की, पवारांच्या त्या वक्तव्यानं दुखावलेलं मराठा मन आता एकत्र येत असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मराठा नेते एवढेच नाही तर कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही ठिकाणचे छत्रपती  हे सुद्धा भाजपमध्ये आले आहेत. सध्या भाजपमध्ये सुरु असलेले मराठा नेत्यांचे पक्ष प्रवेश यामुळे मराठा मनावरील शरद पवारांचा दबदबा कमी होतोय की काय, असं वाटण्याजोगी स्थिती निर्माण झाली आहे.  पाठक पुढे म्हणाले की, आधी 'धर्मनिरपेक्षता' या शब्दाभोवती भाजपविरोधी राजकारण चालायचे. मात्र, आता 'विकास' या शब्दाभोवती भाजपमध्ये लोक येत आहेत. त्यामुळे सध्या भाजपमध्ये सुरु असलेल्या इनकमिंगला विकासाच्या नावाखाली सुरु असलेली जनदिंडी समजलं पाहिजे. एकदा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या की सर्वच पक्षात सुरु असलेली पक्षांतरं बंद होतील.


शरद पवारांच्या त्या वक्तव्यामुळे पवारांवर जातीयवादाचाही आरोप झाला. पवारांनी फक्त फडणवीस यांच्यावरच नव्हे तर छत्रपती संभाजीराजे यांच्यावरही टीका केली.  राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी संभाजीराजे छत्रपतींवर निशाणा साधत म्हटलं की, छत्रपती शिवाजी राजे आणि शाहू महाराज हे केवळ एका जातीचे अथवा जातीयवादी विचारांचे नव्हते. अठरा पगड जातींना सोबत घेऊन त्यांनी बहुजनांचे नेतृत्व केले. पण, कोल्हापूरचे छत्रपती 'जातीयवादी‘ पक्षाच्या व्यासपीठावर गेले. या प्रकरणानंतर कोल्हापुरातीलच एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवारांना प्रत्युत्तरही दिलं. "मी छत्रपतींचा सेवक आहे. मी केवळ लखोटा घेऊन जाण्याचे काम केले. छत्रपती संभाजी राजे यांची राज्यसभेवरील नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती यांनीच केली", असंही फडणवीस म्हणाले होते.

दरम्यान, 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत पाठक यांनी भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या इनकमिंग-पक्षप्रवेशांवरून संघ नाराज नसल्याचाही दावा केला. भाजपची ताकद वाढत असल्यास संघाला आनंदच असेल, असं ते म्हणाले. ज्या ठिकाणी आपली ताकद नाही तिथे प्रस्थापित नेतृत्वाला सोबत घ्यावे लागते असं सांगतानाच पाठक यांनी नागपुरात बनवारीलाल पुरोहित यांच्या भाजपप्रवेशाची आठवणही जागवली. २०१४पूर्वी धर्मनिरपेक्षता हा मुख्य मुद्दा होता. आताही तो महत्वाचा असला तरी आता विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी येत असल्याचं निरिक्षणही पाठक यांनी मांडलं.


 

हे ही वाचा:

पाकिस्तान आणि भारतात वेगळी फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न : शरद पवार