पंढरपूर : देशातले मोदी सरकार सध्या सरकारी यंत्रणा गुन्हेगारांच्या विरोधात वापरण्याऐवजी राजकीय विरोधकांवर वापरत आहेत. माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम सध्या तुरुंगात आहेत तर कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनाही तुरुंगाची हवा खायला लागत आहे, असे सांगत मला ईडीची भीती मात्र दाखवू नका. मी ईडीलाच येडी करून टाकीन अशा शब्दात शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये टोलेबाजी करत भाजप सरकारवर टीका केली. राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार भारत भालके यांच्या प्रचारार्थ पवार यांची सभा आयोजित केली होती.  यावेळी राष्ट्रवादीच्या मंचावर माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही हजेरी लावली.


पवार म्हणाले की, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच देशाचा नव्याने इतिहास लिहिण्याचे वक्तव्य केल्याचे सांगताना राज्य सरकारने चौथीच्या पाठ्यपुस्तकातून शिवाजी महाराजांवरील धडा वगळल्याची माहिती समोर येऊ लागलीय हे गंभीर असून शिवाजी महाराजांसारखा युगपुरुषाचे संस्कार लहान मुलांना अभ्यासात ठेवणे आवश्यक असताना तो काढण्याचे पाप हे सरकार करीत असल्याची टीकाही पवार यांनी केली.

यांच्या हातात आता सत्ता आलीय त्यामुळे आता हे इतिहास बदलण्याची भाषा करू लागल्याचे पवार यांनी सांगितले. यापूर्वी छत्रपतींच्या जाज्वल पराक्रमाचा इतिहास असलेल्या गडकिल्ल्यांवर आता हे दारूचे अड्डे आणि छमछम सुरु करायला लागले आहेत.  तुम्हाला हेच करायचे असेल तर मोडलिंबला जा, असाही टोला लगावला. मुख्यमंत्र्यांच्या पैलवानाच्या भाषणावर आज पुन्हा भाष्य करताना तुम्ही दुसऱ्याला उभे करून कुस्तीची भाषा करताय मात्र आमचे पैलवान तुम्हाला कसे चितपट करतात हे 24 तारखेला दिसेल, असे ते म्हणाले.

सुशीलकुमार शिंदे यांनी भारत भालकेंवर शेरेबाजी करताना ते दोन महिने भाजप आणि शिवसेनेत जाण्याच्या तयारीत होते. मात्र शेवटी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, अशा शब्दात टोला लगावला. ते जाणार म्हणून आम्ही पंढरपूरमधील काँग्रेसची उमेदवारी शिवाजी काळुंगे यांना दिली होती. मात्र आता भारत भालके हेच काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील असे सांगत काळुंगे यांनी उमेदवारी मागे घेतली नसली तरी उमेदवार भालकेच असल्याचा निर्वाळा दिला.