सातारा जिल्ह्यातील माण खटाव विधानसभा मतदार संघ फेररचनेआधी 2009 पर्यंत संपूर्ण माण तालुका आणि फलटण तालुक्यातील 36 गावं असा हा माण विधानसभा मतदारसंघ होता. तर खटाव तालुक्यासाठी संपूर्ण खटाव विधानसभा मतदारसंघ होता. 2009 ला मतदार संघाची पुनर्रचना होऊन संपूर्ण माण तालुका आणि खटाव तालुक्याचा बहुतांश भाग असा मिळून नवीन माण खटाव विधानसभा मतदारसंघ तयार झाला. पूर्वीचा माण विधानसभा मतदारसंघ हा स्वातंत्र्यापासून 2009 पर्यंत कायम राखीव होता. त्यावेळी प्रभावती शिंदे, विष्णूपंत सोनवणे, धोंडिराम वाघमारे, तुकाराम तुपे, संपतराव अवघडे यांनी राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व केले. परंतु या सर्वांना राजकारणात आणून आमदार बनवण्यात सदाशिवराव पोळ यांचा महत्त्वाचा वाटा होता.


किंबहुना सदाशिवराव पोळ यांची चाळीस वर्ष माण विधानसभा मतदारसंघावर जबरदस्त पकड होती. राजकारणात कोणत्याही ओळख नसणाऱ्या व्यक्तीला उभं करुन ते माण विधानसभा मतदारसंघात निवडून आणण्याची ताकत त्यांच्यात होती. त्यामुळे त्यांना या मतदारसंघात किंगमेकर म्हणून ओळखले जाते. तर पूर्वीचा खटाव विधानसभा मतदारसंघ हा खुला मतदारसंघ होता. या मतदारसंघाचे 2004 पर्यंत सलग वीस वर्ष मराठा नसणाऱ्या काँग्रेसचे भाऊसाहेब गुदगे यांनी नेतृत्त्व केले.


2004 ते 2009 भाजपचे डॉ. दिलीप येळगावकर यांनी या मतदारसंघाचे नेतृत्त्व केले, तेही मराठा नव्हते. पुनर्रचनेनंतर प्रथमच खुला झालेल्या माण खटाव विधानसभा मतदारसंघात किंगमेकर सदाशिवराव पोळ हे स्वत: मैदानात असताना अपक्ष असणारे जयकुमार गोरे हे पहिल्यांदा आमदार झाले आणि नंतरच्या काळात किंगमेकर म्हणून ओळख असलेल्या सदाशिव पोळ यांची पकड कमी होत गेली.


या मतदार संघाचा भौगोलिक अभ्यास केला तर  या ठिकाणी ग्रामस्थांच्या दहा एकर पासून ते शंभर एकर पर्यंत जमिनी आजही आहेत. काही ठराविक भाग सोडला तर सर्व जमिनी पाण्याची कमतरता असल्याने पडून आहेत आणि पाणी हाच विषय पुढे करत अनेक राजकारण्यांनी पदांची झालर आपल्या गळ्यात पाडून घेतली. मात्र, आज अखेर तुरळक पाण्याचे डोह तयार करण्यापलीकडे या मतदारसंघात कोणालाच पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवता आलेला नाही.


पाणी परिषदांसारखी असंख्य आंदोलनं आजही पाहायला मिळतात. निवडणुकीच्या कालावधीत या भागात पाण्याच्या प्रश्नावरुन स्टेज गाजत असले तरी मुळात या भागात अनेक निवडणुका या जाती-पातीवरुन झालेल्या पाहायला मिळत आल्या आहेत आणि या जातीची गणितं आजही गावागावातील बैठकांमध्ये दिसून येतात.


माणच्या या मतदारसंघात मराठा, माळी, धनगर या समाजाची लोकसंख्या जास्त आहे. या मतदारसंघात भाऊसाहेब गुदगे यांच्यानंतर 25 वर्ष मराठा आमदार लाभला नाही अशा आरोपाखाली कोपरा बैठकांमध्ये प्रचार करताना अनेक नेते मंडळी पाहायला मिळाली. जयकुमार गोरे यांना पाडण्यासाठी दोन्ही टर्मला हा फॉर्म्युला वापरला गेला. यंदाही त्याचा वापर जास्त प्रमाणात होताना दिसेल. त्यात धनगर समाजाचं नेतृत्त्व करणाऱ्या सत्तेतील महादेव जानकरांचीही पकड कमी पडल्याचे या निवडणुकांमध्ये दिसून आलं.


आमदार जयकुमार गोरे हे माण मतदारसंघात पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवू शकले नाहीत, त्याचबरोबर गोरेंनी मतदारसंघात कोणतीच विकासकामं केली नाहीत अशा प्रचारातून गेल्या अनेक महिन्यांपासून स्टेज रंगताना पाहायला मिळत आहेत, तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी या दुष्काळग्रस्त भागात मतदारसंघात पाणी आणलं असल्याचा उल्लेख गोरे यांनी केला. त्यात त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत मतदारसंघात आलेल्या पाण्यावर बोटिंग करुन मतदारांबरोबर मीडियालाही आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेक आरोपांच्या फैरी झडल्या हा विषय वेगळाच.


आमदार जयकुमार गोरे यांनी साली पहिली निवडणूक लढवल्यानंतर त्यांची पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चांगलीच सलगी वाढली. जयकुमार गोरे काँग्रेस मध्ये गेले आणि काँग्रेसवासी झाल्यानंतर तुटपुंज्या कार्यकर्त्यांवर चालणारा काँग्रेस पक्ष वाढेल असे प्रत्येकाला वाटू लागले, मात्र तसेही झाले नाही. गेल्या पाच वर्षात म्हणावी अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फळी वाढताना कुठेच पाहायला मिळाली नाही. काँग्रेस वाढली नाही मात्र, काँग्रेसच्या दोन गटातील एका गटाबरोबर राहून दुसऱ्या गटावर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळाले.


काँग्रेसमधून गोरेंनी पहिली निवडणूक लढवताना त्यांच्या घरातच उभी फूट पडली. त्यांचे सख्खे भाऊ शेखर गोरे हे त्यांच्यासमोर त्यांचे विरोधक म्हणून ठाण मांडून उभे राहिले. त्यासाठी विरोधकांनी आपले हात धुऊन घेतले, यात शंका नाही. घरातीलच दुफळीमुळे मतांची विभागणी होईल आणि आपण आमदार होऊ असं प्रत्येक विरोधातील पक्षाच्या उमेदवाराला वाटू लागले. साहजिकच हा विषय संपूर्ण निवडणुकींच्या इतर विषयांमध्ये एक मुद्दा होता.


आमदार जयकुमार गोरे आणि त्यांचे बंधू शेखर गोरे यांच्यात कायमच एकमेकांवर गुन्हे दाखल करण्याची साखळी उभी राहत गेली. शिवाय विरोधकांनीही तक्रारदारांच्या पाठिशी उभे राहत गुन्हे दाखल केले. यामुळे तडीपार, मोका या प्रक्रियेपर्यंत या दोन्ही भावंडांना जाण्याची वेळ आलीच तर त्याचबरोबर शेखर गोरे यांनाही काही दिवस तडीपारीच्या प्रक्रियेत रहावे लागले. या आणि इतर अशा अनेक कुरघोड्या एकमेकांवर सुरु असताना राष्ट्रवादीत असणाऱ्या शेखर गोरेंनी पक्षातील लोक कुरघोड्या करत असल्याच्या तक्रारी राष्ट्रवादीतील दिग्गजांना भेटून सांगितल्या.


त्याचा काहीच परीणाम झाला नाही असं म्हणत शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकण्यापूर्वी फलटण येथील शरद पवारांच्या कार्यक्रमात जाऊन स्टेजवरच गोंधळ घालण्याचाही प्रयत्न केला. यावेळी त्यांनी चक्क शरद पवारांचा हात पकडल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. नंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उघड प्रचार केला आणि उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत मनगटात शिवबंधन बांधले.


दुसरीकडे मेगाभरती प्रक्रियेत काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनीही  भाग घेत काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. त्यामुळे मोजक्यांवर चाललेली काँग्रेसची फळी आणखीनच कमकुवत झाली. याच पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे राष्ट्रवादीच्या विरोधात उभे असलेले लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार झाले आणि अंशात्मक असलेल्या भाजपच्या झेंडाला माण मतदारसंघातूनही चागंल्यापद्धतीने मतं मिळाली. या वादामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांचं राजकारण कारणीभूत ठरलं असं राजकीय गोटातून सांगितले जाते.


2019 च्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना आमदार होऊच द्यायचं नाही यासाठी सर्वच पक्षातील प्रतिस्पर्धींनी शड्डू ठोकला असून त्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात भाजप, शिवसेना, रासप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वांनी पक्षाच्या विरोधात भूमिका ठेवण्याचा निर्णय घेत, यातून एक उमेदवार उभा करुन तो निवडून आणायचा असा ठराव केला. उपस्थित सर्वांनीच गुडघ्याला बाशिंग बांधल्यामुळे हा ठराव शेवटपर्यंत टिकेल की नाही हा भाग वेगळाच.


सध्या मात्र संपूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे, ती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय असणारे जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला ? केलेल्या  विकासकामांची यादी पुढे केली जात असली तरी यातली खरी माहिती ही येऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारात बाहेर पडेल असं मतदार, विरोधक सांगतायत.


काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक दहिवडीतील एका मंगल कार्यालयात झाली. या वेळी तालुक्यातील दुसऱ्या फळीतील नेतेगण उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या भाषणात प्रभाकर देशमुख यांचे नाव पुढे केले जात होते. प्रभाकर देशमुख हे पूर्वी पुणे आयुक्त म्हणून काम करत होते. निवृत्त झाल्यानंतर मराठा समाजाची विस्कळीत मूठ बांधण्यासाठी शरद पवारांनी त्यांना आपल्या पक्षात घेतले. प्रभाकर देशमुख यांचे नाव भाषणातून वारंवार पुढे येत असल्यामुळे इतर इच्छुक उमेदवार संतप्त झालेले पाहायला मिळाले. हा कार्यक्रम प्रभाकर देशमुख यांच्याच बगलबच्च्यांनी भरवल्याचं नंतर बोललं गेलं.


आता राष्ट्रवादीतीलच उमेदवारांची ही ओडाताण असेल तर, “आमचं ठरलंय” या टॅगलाईन खाली जयकुमार गोरेंना हरवण्यासाठी एकत्र आलेले सर्व पक्षीय नेते पुढं काय करणार ? असा प्रश्न सध्या माणदेशी विचारतायत. या सर्व प्रक्रियेत जर युती झाली तर कट्टर विरोधक म्हणून ठाण मांडलेले दोघे गोरे बंधू नेमकी काय भूमिका घेणार, एकत्र येणार का ? अशी चर्चा सध्या माणच्या चौका-चौकात सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. आमचं ठरलंय या भूमिकेतून एक उमेदवार दिला तर जयकुमार गोरे यांना ही निवडणूक अवघड जाईल यात शंका नाही. परंतु, जर ठरलेलं बिघडलं तर गोरेंसाठी ही निवडणूक सोपी होऊ शकते का हे येत्या काही दिवसात समजेल.


2019 च्या विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांची नावे


राष्ट्रवादीचे प्रभाकर घार्गे


प्रभाकर देशमुख


डॉ संदिप पोळ


सुरेंद्र गुदगे


भाजपचे अनिल देसाई


डॉ दिलीप येळगावकर


रणजित देशमुख


धनंजय ओंबासे


शेखर गोरे