Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. मतदान सुरु असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या मतदानावर भाजपनं आक्षेप घेतला आहे.  जितेंद्र आव्हाड यांनी मतदान लिहिल्यानंतर थेट जयंत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली असल्याचा आक्षेप भाजप आमदार पराग आळवणी यांनी घेतला आहे.  खरं तर मतपत्रिका दाखवायची असते ती हाताळायला द्यायची नसते.  भाजपचे पराग अळवणी यांनी यावर हरकत घेतली आहे. आत्तापर्यंत झालेलं मतदान वैध झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपकडून पराग आळवणी आणि आशिष शेलार यांनी घेतलेले आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने जो आक्षेप घेतलाय तो निवडणूक अधिकाऱ्याने फेटाळून लावला आहे. आमचे चार ही उमेदवार निवडून येणार असा दावा मंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. 


तर दुसरीकडे  काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी अशाच पद्धतीने नाना पटोले यांच्या हातात मतपत्रिका दिली आहे, असा आक्षेप घेण्यात आला आहे. या दोन्ही मुद्द्यांवर भाजपने हरकत घेतली आहे.  ही दोन्ही मतं बाद करावी अशी भाजपची मागणी आहे. यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्याबाबत पराग अळवणी यांनी आक्षेप घेतला होता.


प्रसाद लाड यांनी म्हटलं की, आम्ही महाविकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड आणि सुहास कांदे यांनी पोलिंग एजंटला मतदान केल्यानंतर मतपत्रिका दाखवण्याऐवजी हाताळायला दिली.  ही चुकीची पद्धत आहे. ही तिन्ही मत बाद व्हावीत. या तिन्ही मतांवर आम्ही आक्षेप घेतला आहे. यावर आम्ही निवडणूक आयोगाकडे सुद्धा तक्रार करणार आहोत, असं लाड म्हणाले.


जितेंद्र आव्हाड यांनी दिलं स्पष्टीकरण


जितेंद्र आव्हाड म्हणाले की, यांच्या डोळ्याला थ्रीडी कॅमेरा लावला आहे का. मी कुणाला उत्तर द्यायला बांधिल नाही. हे लोकं घाबरले आहेत, बावचळले आहेत. हे प्रकार बालिश आहेत. मला नियम माहित आहेत. आम्ही कसे महान आहोत, हे दाखवण्याचा प्रकार आहे. मी काय केलंय हे का सांगू असंही ते म्हणाले. मी या आक्षेपांकडे लक्ष देत नाही, असं आव्हाड म्हणाले. 


आदित्य ठाकरेंच्या मतपत्रिकेवर निवडणूक आयोगाचा शिक्का नव्हता


आदित्य ठाकरे यांनी मतदान करताना त्यांच्या मतपत्रिकेवर निवडणूक आयोगाचा शिक्का नव्हता.  त्यामुळे आदित्य ठाकरे यांची पहिली मतपत्रिका बाजूला ठेवण्यात आली आहे.  निवडणूक आयोगाने त्यांना दुसरी मतपत्रिका दिली त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला.  पहिल्या मतपत्रिकेवर शिक्का का नव्हता याचा तपास निवडणूक अधिकारी करतील