कोल्हापूर : शरद पवार यांनी कधीही भ्रष्टाचार केला नाही. मी पवारांवर कधीही वैयक्तिक आरोप केले नाहीत असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शरद पवारांची पाठराखण केली आहे. शिखर बँकेचा घोटाळा, साखर कारखाना विक्री व्यवहार घोटाळा, बेकायदेशीर कर्ज प्रकरण घोटाळ्याचे  राजू शेट्टी पहिले तक्रारदार आहेत.  पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनला राजू शेट्टी यांनी पहिली तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने त्यांच्याशी संवाद साधला.


यावेळी त्यांनी मुख्यमंत्री हे जाणीवपूर्वक भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन पावन कसे करतात त्याची अनेक उदाहरणं दिली.  अजित पवार, दिलीप देशमुख, मधुकराव चव्हाण ते नितीन गडकरी यांच्यापर्यंत अनेक जणांनी साखर कारखाने विकत घेऊन घोटाळे केले, असा आरोपही त्यांनी केला.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, मी चुकीचं समर्थन करणार नाही. चौकशी झाली पाहिजे. चोरांना पकडलेच पाहिजेत. यासाठी  मी ईडीला भेटलो. याचिका दाखल केली. अण्णा हजारेंनी देखील तक्रार दाखल केली, असे त्यांनी सांगितलं. यामध्ये सर्व पक्षाचे नेते आहेत. संचालक मंडळाने लायक नसलेल्या लोकांना कर्ज दिले, असा आरोप शेट्टी यांनी केला.

ज्यांच्या आशिर्वादाने कर्ज दिले ते बहुसंख्य लोक भाजपमध्ये आहेत, असेही ते म्हणाले. या प्रकरणाचा भाजपा आणि सरकार आपल्या सोयीने वापर करून घेत आहे.

संचालकांनी हे पैसे त्यांनी स्वतः वापरले नाहीत. कर्ज देताना अनियमितता झाली. विजयसिंह मोहिते यांनी रिकाम्या साखर कारखान्यांच्या जागेवर कर्ज घेतले. दिलीप सोपलांच्या साखर कारखान्यावर जप्तीची नोटीस आली. मात्र जप्तीच्या आधीच सरकारच्या परवानगीने कारखान्याच्या भोवतालची सगळी जमीन विकून टाकली त्यामुळे आज कुणी कारखाना घ्यायला तयार नाही, असे शेट्टी म्हणाले.