नवी दिल्ली : पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने चांगले यश प्राप्त केले आहे. त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेमध्ये राहुल म्हणाले की, भाजपला आम्ही आज हरवले आहे. 2019 मध्येदेखील हरवणार आहोत.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज मतमोजणी करण्यात आली. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने बहुमत मिळवले आहे. तसेच मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सध्या आघाडीवर असून बहुजन समाज पार्टी तसेच समाजवादी पार्टीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

राहुल गांधी यांनी आज मिळालेल्या विजयाचे संपूर्ण श्रेय काँग्रेसचे कार्यकर्ते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिले आहे. राहुल यांनी भाजपच्या मुख्यमत्र्यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, तीनही राज्यांमध्ये भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले काम आपण येत्या काळात पुढे नेणार आहोत. या राज्यांमधील लोकांना अभिमान वाटेल असे काम करणार आहोत.

राहुल गांधी म्हणाले की, आज आमच्या विचारधारेचा विजय झाला आहे. मागच्या सरकारने शेतकरी आणि तरुणांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे जनतेने यावेळी आमच्या बाजुने कौल दिला आहे. बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची विचारधारा सारखी आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये आम्ही सत्ता स्थापन करु.