Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा (Lok Sabha Elections 2024) निवडणुकीबाबत मनसे (Maharashtra Navnirman Sena) चाचपणी करताना दिसून येत आहे. याचं कारण म्हणजे कोकणातल्या (Konkan News) रायगड लोकसभा मतदारसंघात (Raigad Lok Sabha Constituency) मनसेने (MNS) राजकीय परिस्थितीचा (Maharashtra Political Updates) आणि पक्षाच्या राजकीय ताकदीचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मनसेने आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान या प्रश्नावर बोलताना मनसेच्या कोकणातल्या काही नेत्यांनी याला दुजोरा दिला आहे. आगामी काळात मनसेकडून रायगडमधील विधानसभा मतदारसंघनिहाय आणि तालुकास्तरावर बैठका घेऊन तालुका चर्चा आणि राजकीय ताकदीची चाचपणी केली जाणार आहे. त्यामुळे आता कोकणातल्या रायगड लोकसभा मतदारसंघात मनसे येणारा लोकसभा निवडणुकीत मैदानात उतरणार का? याबाबतची चर्चा जोरात सुरू झाली आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. सध्या रायगड लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे खासदार आहेत. त्यामुळे सुनील तटकरे यांच्यासमोर उमेदवार कोण असणार? मनसेने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास तटकरे विरोधात चेहरा कोण देणार? यासारखे प्रश्न आणि त्याबाबतची उत्सुकता दिसून येत आहे.


राज ठाकरेंचा कोकण दौरा आणि जागर आंदोलन


मागील सहा ते आठ महिन्यांचा विचार केल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दोन वेळा कोकण दौरा केला. रत्नागिरी येथे जाहीर सभा देखील घेतली. संघटनानिहाय काही बदल देखील केले. गटबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना धारेवर घेतले. आपल्या दौऱ्या वेळी आणि रत्नागिरी येथे झालेल्या सभेवेळी राज ठाकरे यांनी कोकणी माणसाला साद घातली. आपल्या भाषणांदरम्यान त्यांनी कोकणातल्या काही मूलभूत प्रश्नांना हात घातला. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे? स्थानिक स्वराज्य संस्था असो, विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांमध्ये मनसे कोणत्या कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार? याबाबत देखील काही सवाल आणि चर्चा रंगल्या. त्यामुळे आता रायगड लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दुजोऱ्यानंतर आगामी काळात मनसेची पावलं नेमकी कशी आणि कोणत्या दिशेने पडतात? हे देखील पाहावं लागेल.


कोकणातील काही प्रश्नांवर बोलताना राज ठाकरे यांनी मुंबई - गोवा महामार्गाचा, रखडलेल्या कामांचा उल्लेख करत सरकारवर जोरदार टीका केली होती. कोकणात जागर यात्रा देखील काढली होती. कोलाड येथे छोटेखानी सभा देखील घेतली होती. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय सुरू आहे? याबाबतची उत्सुकता प्रत्येकाला होती. दरम्यान या सर्व प्रश्नांचे उत्तर आगामी काळात मिळतील, अशी आशा करायला काहीच हरकत नाही.


सेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेचा आव्हान?


कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला ओळखला जातो. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेला कोकणी माणूस, शिवसेनेचा पारंपारिक मतदार किती साथ देणार? हे आगामी काळात स्पष्ट होईल. मुख्य गोष्ट म्हणजे शिवसेनेत पडलेल्या मोठ्या दुहिनंतर त्याचा फायदा मनसेला होईल का? मनसेची रणनीती नेमकी काय असेल? राज ठाकरे कोकणी माणसाला आपलंसं करण्यात यशस्वी होतील का? यासारखे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पण येणाऱ्या निवडणुका आणि त्यांचे निकाल त्यावरचे उत्तर असणार हे मात्र नक्की!