नवी दिल्ली : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या शिवसेना-भाजपच्या युतीवर आज शिक्कामोर्तब झाले. दोन्ही पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढतील. तुटलेली युती पुन्हा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. मोदी यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "अटल बिहारी वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुरदृष्टीने प्रेरीत होऊन पुन्हा एकदा हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत."


मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुरदृष्टीने प्रेरीत होऊन भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा युती केली आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि राज्याला भ्रष्टाचारमुक्त करण्यसाठी पुन्हा एकदा हे दोन्ही पक्ष एकत्र येतील."



दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृष घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "काही मुद्द्यांवर आमचे आणि शिवसेनेचे मतभेद असतील, परंतु सैद्धांतिकदृष्ट्या आम्ही दोघेही हिंदुत्वाचा विचार मानणारे पक्ष आहोत. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत."






VIDEO :युतीच्या राजकारणाची ब्लॉकबस्टर फिल्म