Election Results 2021: पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरी येथे मतमोजणी सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पक्ष टीएमसी हॅटट्रिक मारताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणूक निकालांवर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालमधील टीएमसीच्या विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन, केंद्र पश्चिम बंगालच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करत राहील, असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.


केरळमध्ये मोठा विजय मिळविणारे मुख्यमंत्री पिनरायी विजयन आणि तामिळनाडूमधील विजयाबद्दल डीमएके प्रमुख एमके स्टालिन यांचेही पंतप्रधान मोदी यांनी अभिनंदन केले. पश्चिम बंगालमधील एकूण 294 जागांपैकी 292 जागांवर मतदान झाले. त्यापैकी टीएमसीला 200 हून अधिक जागा मिळतील असे दिसत आहे.






सातपर्यंतचा कल
पश्चिम बंगाल
कूण 292 जागा (बहुमतासाठी 147 जागा आवश्यक)
टीएमसी - 215 जागांवर पुढे/विजय
भाजप - 75 जागांवर आघाडी/विजय
काँग्रेस + डावे + आयएसएफ - एका जागेवर पुढे/विजय
इतर - 1 पुढे/विजय


2016 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने (TMC) 211 जागा जिंकल्या. भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 44 जागा आणि डाव्या पक्षांच्या 26 जागांवर समाधान मानावे लागले होते.


नंदीग्राममध्ये पुन्हा मतमोजणीची मागणी
देशाचे लक्ष लागून असलेल्या नंदीग्राममध्ये तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत झाली. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत ममता बॅनर्जी यांचा 1953 मतांनी पराभव झाला आहे. मात्र आधी ममता बॅनर्जी यांचा विजय झाला असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी निकाल मान्य करते. पण निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून याविरोधात कोर्टात जाणार आहे. मी सत्य समोर आणणार आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. यासंदर्भात एएनआयनं ट्वीट केलं आहे. दरम्यान नंदीग्रामध्ये फेर मतमोजणीची मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.