मुंबई : धुळे महानगरपालिका निवडणुकांमधून डावलल्याने नाराज असलेले भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत भाजवविरोधात लढण्याची भूमिका अनिल गोटे यांनी घेतली आहे. तसेच धुळ्यात भाजप उमेदवाराचा पराभव करणं हेच आपलं लक्ष्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


धुळ्यात भाजप पक्षात मोठा भ्रष्टाचार, अनागोंदी माजली आहे. पक्षातील ही घाण आपल्याला साफ करायची आहे. सरंक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचा याठिकाणी पराभव करणे हे एकमात्र लक्ष्य असल्याचंही गोटे यांनी स्पष्ट केलं आहे.


शरद पवारांना माझी भूमिका सांगण्यासाठी मी त्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मला कशी मदत करायची हा त्यांचा निर्णय असणार आहे. तसेच शरद पवारांना पुन्हा भेटणार असल्याचंही गोटे यांनी स्पष्ट केलं आहे. अनिल गोटे यांनी लोकसभा निवडणुकीत विरोधी भूमिका घेतल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.


शरद पवार आणि अनिल गोटे यांच्यात तेलगी प्रकरणावरुन वाद झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनिल गोटे यांचा 'तेलगीचा मित्र' म्हणून उल्लेख केला होता. त्यानंतर शरद पवार आणि अनिल गोटे यांच्यातील वाद अवघ्या महाराष्ट्राने पाहिला होता. मात्र शत्रूचा शत्रू मित्र या नात्याने अनिल गोटे वैर विसरुन शरद पवारांच्या भेटीला गेले होते.



भाजप-अनिल गोटे वाद?


आमदार अनिल गोटे यांना धुळ्यातल्या महानगरपालिका निवडणुकांमधून डावलल्याने त्यांनी नव्या 'लोकसंग्राम' पक्षाची स्थापना केली होती. त्यांनी 'लोकसंग्राम' या पक्षाच्या चिन्हावर दोन, तर अपक्ष 57 असे 59 उमेदवार उभे केले. पण त्यांना केवळ आपल्या पत्नीला विजयी करता आलं. त्यांच्या मुलगा तेजस गोटे यांचाही पराभव झाला. मतदारांनी गोटे यांना नाकारलं.


भाजपचेच आमदार असलेल्या अनिल गोटे यांनी भाजपसमोर आव्हान उभे केले. त्यांनी 'लोकसंग्राम' या पक्षाच्या चिन्हावर दोन, तर अपक्ष 57 असे 59 उमेदवार उभे केले. पण त्यांना केवळ आपल्या पत्नीला विजयी करता आलं. त्यांच्या मुलगा तेजस गोटे यांचाही पराभव झाला. मतदारांनी गोटे यांना नाकारलं होतं.