मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यातील मंत्रिमंडळात जादा मंत्रीपदे मागितली तर आहेच, शिवाय दिल्लीत देखील कॅबिनेट मंत्रीपद द्या, अशी मागणी देखील केली आहे. राष्ट्रवादीच्या या मागणीला अद्याप हिरवा कंदील मिळाला नसला तरी तो हवा असल्यास भाजप नेतृत्वाने देखील काही अटी शर्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर ठेवल्या असल्याची माहिती पुढे आली आहे. 

Continues below advertisement

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला करिष्मा दाखवू शकला नसला तरी विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार बॅटिंग करत 54 पैकी तब्बल 41 आमदार निवडून आणून आपला स्ट्राइक रेट वाढवलाय. आणि आता याच स्ट्राईक रेट वर पुढील वाटाघाटीत बोलणी सुरू केल्या असल्याचं पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीतील कामगिरीच्या बळावर दिल्लीत एक कॅबिनेट आणि राज्यात देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबतच आपल्या देखील पक्षाला तितकीच मंत्रीपदं दिली जावीत, अशी मागणी केलीय. यासाठी पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व थेट दिल्लीत मागच्या 24 तासांपासून ठाण मांडून बसल आहेत. मागील आठवड्यात पार पडलेल्या अमित शाह यांच्या सोबतच्या महायुतीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्याला मंत्रीमंडळात 11 जागा मिळाव्यात, अशी मागणी केली खरी, परंतु अमित शाह यांच्या वतीने देखील एका अट टाकण्यात आल्याची माहिती समोर येतेय.

Continues below advertisement

शरद पवारांसोबतचे खासदार सोबत आले तर..

एबीपी माझाला मिळालेल्या सूत्रांचा माहितीनुसार शरद पवारांसोबत असलेले आमदार आणि खासदार सोबत आल्यास प्रफुल पटेल यांना केंद्रात संधी देण्याबाबत विचार केला जाईल, अशी अट ठेवण्यात आली आहे. यामुळेच मागील काही दिवसांपासून अजित पवाराच्या पक्षाच्या वतीने खासदार आणि आमदाराना संपर्क साधण्यात येत आहे

एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात आणि केंद्रात सत्तेत बसायचं असल्यास शरद पवारांसोबत असलेल्या खासदाराना सोबत आणल्या शिवाय पर्याय नाही. कारण यामुळे केंद्रातील महायुतीला शरद पवारांच्या 9 खासदारांमुळे चांगलंच बळ मिळण्याची शक्यता आहे. शिवाय संख्याबळच्या आधारावर महायुतीला प्रफुल पटेल यांना मंत्रिपद देण्यास अडचण येणार नाही. 

भाजपची नेता निवड उद्या

भाजप विधिमंडळ पक्षाचा नवा नेता निवडण्यासाठी बुधवारी मुंबईत बैठक पार पडेल. त्यासाठी भाजपने निरीक्षक म्हणून नेमलेले विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन या मंगळवारी संध्याकाळी मुंबईत दाखल होतील. बुधवारी सकाळी 10 वाजता विधानभवनात भाजपच्या आमदारांची बैठक पार पडेल. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड होईल, असे सांगितले जात आहे. यानंतर महायुतीचे नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील. 

सूत्रांच्या माहितीनुसार, महायुती सरकारचा शपथविधी गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानावर संपन्न होईल. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर, धर्मगुरु, संत-महंत उपस्थित राहणार आहेत. 

हे ही वाचा