मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी मुंबईतील वरळीनंतर आता माहीम विधानसभा मतदारसंघ सर्वात लक्षवेधी ठरला आहे. कारण, येथील मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकांच्या रणांगणात उतरले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेविरुद्ध (MNS) महायुतीकडून विधानसभेला उमेदवार देण्यात आला आहे. माहीम मतदारसंघात शिवसेना उमेदवार सदा सरवणकर हे अमित ठाकरेंविरुद्ध (Amit Thackeray) निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे, मनसे-शिवसेना आणि भाजप यांच्यात राजकीय शीतयुद्ध सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, शिवसेना महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर ह्यांनी पडत्या काळात आपली साथ दिल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. तर, अमित ठाकरे हे आपल्याच घरातील मुलगा असल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटंलय. या चर्चेदरम्यान, आता सदा सरवणकर यांनी थेट वर्षा बंगला गाठला आहे. त्यामुळे, माहीमबाबात काहीतरी मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  


विद्यमान आमदार आणि शिवसेना उमेदवार सदा सरवणकर यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फढणवीस यांची भेट घेतली.  या भेटीत माहीम मतदारसंघाबाबत चर्चा झाली असून महायुतीचा उमेदवार उभा राहणार की नाही, याबाबत महायुतीकडून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो. कारण, माहीम-दादर विधानसभा मतदारसंघात मनसे नेते अमित ठाकरे यांची देखील उमेदवारी जाहीर झालीय. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये शिष्टाईचे प्रयत्नं सुरू असल्याची माहिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर सदा सरवणकर यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे यांच्या पक्षाकडून येथील मतदारसंघात महेश सावंत यांना तिकीट देण्यात आलंय. महेश सावंत हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांना अमित ठाकरेंविरुद्ध उतरवण्यात आलंय. 


अमित ठाकरेंच्या उमेदवारीबाबत सदा सरवणकर यांनी एबीपी माझाशी बोलताना आपली भूमिका मांडली होती. सदा सरवणकर म्हणाले, आशिष शेलार आणि राज साहेबांची एक चांगली मैत्री आहे. आता मैत्रीसाठी त्यांनी जर काहीतरी स्वतंत्र बोलले असतील तर तो त्यांचा भाग आहे. मी सोमवारी जाऊन अर्ज भरणार आहे. केसरकर साहेब आणि मी कधीकधी भेटत असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर माझा विश्वास आहे. त्यांनी एबी फॉर्म दिलाय. महायुतीचा उमेदवार म्हणून आमचा मेळावाही झालाय. निवडणूक अर्ज भरू नका म्हणून माझ्यासाठी एकही फोन नाही. मला कोणाचीही अद्याप विनंती नाही, असंही सदा सरवणकर यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर, आज ते वर्षा बंगल्यावर चर्चेसाठी आल्याचं पाहायला मिळालं. 


हेही वाचा


सुजयवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न होता, त्याची माफी कोण मागणार?; विखे पाटलांचा जयश्री थोरातांना सवाल