Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल दोन्हीकडे जागा वाटपामध्ये घराणेशाहीनं पुरतं घेरलं असल्याचं आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांवरून स्पष्ट झालं आहे. काही ठिकाणी सख्खे भाऊ रिंगणात आहेत, तर काही ठिकाणी खासदाराची बहीण रिंगणात आहे. काही ठिकाणी बाप विरुद्ध मुलगी अशी लढत होत आहे. त्यामुळे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल सर्वत्र घराणेशाहीने पोखरलं असल्याचे दिसून येत आहे.


काँग्रेसला वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीपासून वाचवा


दरम्यान, काँग्रेसमध्ये सुद्धा आता उमेदवारीवरून वाद पेटला आहे. मुंबईमध्ये खासदार वर्षा गायकवाड यांच्या बहिणीला काँग्रेसकडून तिकीट मिळालं मिळाल्यानंतर आता चांगलाच वाद पेटला आहे. काँग्रेसला वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीपासून वाचवा अशी मागणीच मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य अमित शेट्टी यांच्याकडून करण्यात आली आहे. शेट्टी यांनी वर्षा गायकवाड यांच्या पतीवरही गंभीर आरोप केले आहेत. 


फक्त वर्षा गायकवाड यांची बहीण म्हणून उमेदवारी देण्यात आली


शेट्टी यांनी म्हटले आहे की, हे दोघेही काँग्रेस पक्ष विकण्यासाठी चालले आहेत. अमित शेट्टी म्हणाले की, वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीपासून काँग्रेस पक्षाला वाचवण्याची गरज आहे. पक्षातील वरिष्ठांना डावलून वर्षा गायकवाड यांच्याशी खास असलेल्या लोकांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघांमध्ये साडेचार वर्षे ज्यांनी पक्षासाठी काहीच काम केले नाही, वर्षा गायकवाड यांचे मागे फिरले त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. धारावीत जे पक्षाचे सदस्य सुद्धा नाहीत अशा ज्योती गायकवाड यांना फक्त वर्षा गायकवाड यांची बहीण म्हणून उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. या उमेदवारीचा काँग्रेसला फार मोठे नुकसान होणार असल्याचे शेट्टी यांनी म्हटलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या