Raj Thackeray: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष उमेदवार याद्या जाहीर करत आहेत, अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मनसे उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. कोपरी पाचपाखाडी मतदार संघात अभिजित पानसे यांची उमेदवारी निश्चित झाली होती, मात्र आता उमेदवारी न देण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. कोकण पदवीधर मतदार संघातून देखील अभिजित पानसे यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगण्यात आले होते.


आता ठाण्यात, ठाणे शहर मतदारसंघातून अविनाश जाधव, ओवळा माजिवडा इथून संदीप पाचांगे आणि कळवा मुंब्रा इथून सुशांत सूर्यराव हे उमेदवार विधानसभा निवडणूक लढणार आहेत. मुख्यमंत्री यांच्यासोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. जरी अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेने सदा सरवणकर यांनी उमेदवारी जाहीर केली असली तरी राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी, "राज ठाकरे दोस्तीचा दुनियेतला राजा माणूस आहे" अशी प्रतिक्रिया दिली आहे. 


कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंना विरूध्द केदार दिघे


कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोपरी पाचपाखाडीतून शिवसेना (ठाकरे गट) विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) असा सामना रंगणार आहे. केदार दिघे यांच्यामुळे एकनाथ शिंदेंना मोठं आव्हान निर्माण झालं आहे. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ 2009च्या आधी ठाणे शहर मतदारसंघात समाविष्ट होता. नंतर मतदारसंघाच्या पुनर्रचनेत कोपरी पाचपाखाडी हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. तेव्हापासून एकनाथ शिंदे या मतदारसंघाचे नेतृत्त्व करत आहेत. या मतदारसंघामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा मोठा समर्थक वर्ग आहे. 


अमित ठाकरेंच्या विरोधात सदा सरवणकर 


माहीम मतदारसंघाची लढत चुरशीची होणार आहे. माहीममध्ये राजपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उत्तर आहेत. अशातच सर्वात आधी चर्चा होती की, उद्धव ठाकरे पुतण्याविरोधात उमेदवार देणार नाही. पण, ठाकरेंनी उमेदवार रिंगणात उतरवला. आता तिरंगी लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच आज राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर जाऊन शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेतली. तसेच, मुख्यमंत्री शिंदेंचा निरोप घेऊन केसरकर राज ठाकरेंकडे गेल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता सदा सरवणकरांच्या उमेदवारीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आता सदा सरवणकरांच्या उमेदवारीबाबत खलबतं सुरू असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरू आहे? अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत.