बीड: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद खंडपीठाने परळी मतदारसंघातील 112 मतदान केंद्र ही अतिसंवेदनशील घोषित करा, असे निर्देश दिले आहेत. या अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि एसआरपीच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी विनंती करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. संबंधित याचिकेवरील सुनावणीवेळी खंडपीठाने निवडणूक आयोगाला परळीतील (Parli Vidhan Sabha constituency) 112 मतदार केंद्र ही अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करावीत, असे आदेश दिले. या निर्देशाची अंमलबजावणी करुन न्यायालयात शपथपत्र दाखल करावे, असेही निवडणूक आयोगाला सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता परळीत निवडणूक आयोगाकडून संबंधित निर्देशाच्या कार्यवाहीला सुरुवात होऊ शकते.


बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाला महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळे स्थान आहे. या मतदारसंघावर आतापर्यंत मुंडे घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत परळीत भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यात लढत झाली होती. यामध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. यंदा पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्यामुळे धनंजय मुंडे हे अजित पवार गटाकडून परळी मतदारसंघाचे उमेदवार असतील. त्यांच्याविरोधात शरद पवार गटातून कोण उभे राहणार, याबद्दल उत्सुकता आहे. शरद पवार गटाकडून परळीतून भगवान सेनेचे फुलचंद कराड रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. मात्र, शरद पवार गटाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 


मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि जातीय समीकरणे बदलली आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे आणि मराठा फॅक्टरमुळे बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यांच्याविरोधात शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे हे निवडणुकीला उभे होते. मराठी विरुद्ध ओबीसी संघर्षामुळे बीड लोकसभेची निवडणूक लक्षवेधी ठरली होती. तसाच प्रकार आता परळी विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळू शकतो. 


लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये बुथ कॅप्चरिंगचा आरोप


लोकसभा निवडणुकीवेळी बीड लोकसभा मतदारसंघातील राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तापले होते. लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी बीडमधून बुथ कॅप्चरिंगच्या तक्रारी समोर आल्या होत्या. तसेच मतमोजणीवेळीही केंद्रावर जोरदार राडा झाला होता. हा अनुभव लक्षात घेऊन उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने परळी विधानसभा मतदारसंघातील 112 मतदान केंद्र ही अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्याचा इशारा दिला असावा, अशी चर्चा आहे.


आणखी वाचा


परळी मतदारसंघांमध्ये मोठी दहशत, अनेक लोक जेलमध्ये गेले, धनंजय मुंडे मंत्री म्हणून फेल झाले; शरद पवार गटाचा हल्लाबोल