मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबईत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली. मुंबईतील प्रत्येक मतदारसंघातून तीन इच्छुकांचे नाव ठरवणार आणि ती यादी दिल्लीत पाठवणार आहे. दिल्लीत निवडणूक समिती उमेदवार निश्चिती करणार अशी माहिती आहे. दरम्यान मुंबई काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण अजूनही संपलेले नाही. मुंबईतील काही जागांसाठी अनेक उमेदवार इच्छुक असल्यामुळे गटबाजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मुंबईतील विधानसभा उमेदवार निवडीबाबत काँग्रेसने एक समिती बनवण्याचा निर्णय घेतला आहे.


मुंबई काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी मुख्य नेत्यांपेक्षा त्यांची मुलं विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक दिसत आहेत. वांद्रे पश्चिम येथील जागेवर इथे बाबा सिद्दिकी स्वतः इच्छुक नाही, त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. पण त्यांचा मुलगा झिसीन सिद्दिकी मात्र निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.

दुसरीकडे कृपाशंकर सिंह यांनी आपला मुलगा नरेंद्र मोहन सिंह याला उमेदवारी द्यावी अशी मागणी केल्याचे समजते. लातूर ग्रामीण मधून अमित देशमुख यांचे बंधू धीरज देशमुख उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे.

मुंबई विधानसभा उमेदवारांची निवड समिती करणार आहे. या समितीत माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, मिलिंद देवरा, संजय निरुपम यांचा समावेश असणार आहे. ही समिती उमेदवारीचे आलेले अर्ज, इच्छुक पाहून उमेदवारांची यादी बनवणार आहेत.

एकीकडे निवडणुकीच्या तोंडावर आल्या असताना पक्ष सोडून जाणारे आमदार आणि निवडणूक लढवण्यास योग्य उमेदवार मिळवणे हे दुहेरी आव्हान काँग्रेसपुढे आहे.