मुंबई: महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीचे (Vidhan Parishad Election) घमासान पाहायला मिळणार आहे. विधानपरिषदेसाठी 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळली असून भापजचे पाच तर महाविकास आघाडीचे सहा उमेदवार एकमेकांशी भिडणार आहेत. 


भाजपच्या वतीने सदाभाऊ खोत यांनी शेवटच्या क्षणी आपला अर्ज माघार घेतला असून राष्ट्रवादीच्या वतीने शिवाजीराव गर्जे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला. त्यामुळे आता विधानरपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. 


विधान परिषदेसाठी रिंगणात उतरलेले उमेदवार 


शिवसेना (Vidhan Parishad Shiv Sena Candidate)
सचिन अहिर (Sachin Ahir)
आमश्या पाडवी (Aamshya Padvi)


राष्ट्रवादी (NCP Vidhan Parishad Candidate)
एकनाथ खडसे (Eknath Khadse)
रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar)


काँग्रेस (Vidhan Parishad Congress Candidate)
भाई जगताप (Bhai Jagtap)
चंद्रकांत हंडोरे (Chandrant Handore)


भाजप (Vidhan Parishad BJP Candidate)
प्रवीण दरेकर (Pravin Darekar)
उमा खापरे (Uma Khapre)
श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiy)
राम शिंदे (Ram Shinde)
प्रसाद लाड (Prasad Lad)


पाचवी जागा आम्ही जिंकणार, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये तिसरा उमेदवार निवडून आणल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास दुणावला असून विधानपरिषदेची पाचवी जागाही अशाच पद्धतीने निवडून आणणार असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. सत्तारुढ गटामध्ये असंतोष आहे, त्यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे, त्यामुळे आम्ही पाचवी जागा लढवणार आणि जिंकणार असंही ते म्हणाले. 


नवाब मलिक आणि अनिल देशमुखांच्या मताचं काय होणार?
राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचं असताना राष्ट्रवादीच्या जेलमध्ये असलेल्या सदस्यांच्या दोन मतांचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच मुंबई सत्र न्यायालयानंतर उच्च न्यायालयाकडूनही नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला. त्यामुळे आता विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी तरी यांना परवानगी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.