नाशिक : नांदगाव विधानसभा मतदारसंघात (Nandgaon Assembly Constituency) गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नांदगावमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र आता नांदगाव विधानसभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी रंगताना पाहायला मिळत आहे. 


नांदगाव मतदार संघातील अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या रॅलीला उशीर झाल्याने नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास अवघा 1 मिनिट शिल्लक राहिलेला असताना समीर भुजबळ धावत-पळत तहसील कार्यालयात दाखल झाले. समीर भुजबळ हे कार्यकर्त्यांच्या दुचाकीवरून पोहचत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. समीर भुजबळ पोहचण्यापूर्वी आमदार सुहास कांदे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सपत्नीक तहसील कार्यालयात पोहचले. यावेळी दोघे उमेदवार एकमेकांसमोर आल्याचे दिसून आले.


भर सभेत ऐकवली कॉल रेकॉर्डिंग


तर समीर भुजबळ यांच्या सभेत नांदगांव लोकशाही धडक मोर्चाचे पदाधिकारी शेखर पगार यांनी आमदार सुहास कांदे हे दहशत पसरवित दादागिरी करत असल्याचा आरोप केला. सुहास कांदे यांच्या विरोधात मंचावर बोलणाऱ्या पदाधिकाऱ्याला काही मिनिटातच सुहास कांदे यांनी फोन करत शिवीगाळ केल्याचा आरोप समीर भुजबळांच्या समर्थकांकडून करण्यात आलाय. समीर भुजबळांच्या सभेतच शिवीगाळाची कॉल रेकॉर्डिंग उपस्थितांना ऐकवण्यात आली. यानंतर सुहास कांदे यांच्याविरोधात घोषणाबाजी आणि रोष व्यक्त करण्यात आला. 


अजित पवार गटाचे समन्वयकावर सुहास कांदे संतापले


त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे समन्वयक विनोद शेलार यांना आमदार सुहास कांदे यांनी जाब विचारला. एकेरी उल्लेख केल्याने सुहास कांदे यांनी विनोद शेलार यांच्यावर संताप व्यक्त केला. समीर भुजबळ यांचा अर्ज दाखल करायला जात असताना ही घटना घडली. त्यामुळे सुहास कांदे आणि विनोद शेलार यांच्यात वाद झाल्याचे दिसून आले. 


काय म्हणाले समीर भुजबळ? 


दरम्यान, याबाबत समीर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, भयमुक्त नांदगाव असे मी पहिल्या दिवसापासून बोलत आहे. यासाठीच मला लोकांनी बोलावले आहे. म्हणून मी पक्षाचा राजीनामा देऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नेत्याने केवळ भाषण केले म्हणून त्याला धमक्यांसाठी फोन येतात, मी निवडणूक आयोग आणि पोलिसांना विनंती करतो की, आमच्या कार्यकर्त्यांना संरक्षण मिळाले पाहिजे. या सर्व घटनांची दखल घ्यावी, अशी विनंती समीर भुजबळ यांनी पोलिसांना केली आहे. 


आणखी वाचा 


Maharashtra Assembly Consituency 2024 : विधानसभेची खडाजंगी : येवला मतदारसंघाचा गड छगन भुजबळ राखणार की परिवर्तन होणार?