मुंबई : राज्यात सध्या गणेशोत्सवाची धामधूम असली तरी विधानसभा निवडणुकीची तारखेची उत्सुकताही तेवढीच आहे. ही उत्सुकता लवकरच संपणार आहे, कारण गणेशोत्सवानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीची घोषणाही गणेश उत्सावानंतरच झाली होती.


सध्याच्या तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर 2019 रोजी संपत आहे. त्यामुळे त्याआधी निवडणुकीची सगळी प्रक्रिया पूर्ण करणं निवडणूक आयोगाला बंधनकारक आहे. म्हणूनच 2019 च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा गणेशोत्सव संपल्यानंतर कधीही होऊ शकते.

यंदा 2 ते 12 सप्टेंबर या कालावधीत राज्यात गणेशोत्सव आहे. 2 सप्टेंबरला गणेश चतुर्थी असून 12 सप्टेंबरला अनंत चतुदर्शी आहे. या दिवशी गणेश विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

2014 मध्ये गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आणि 12 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली होती. 15 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडलं होतं आणि 19 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला होता. यानंतर 31 ऑक्टोबर रोजी सरकारचा शपथविधी झाला होता.

त्यामुळे आता कोणत्या तारखेला मतदान आणि मतमोजणी होणार, आचारसंहिता लागू होणार याची उत्सुकता आहे.