मराठवाडा आणि खानदेशच्या सीमेवरचा मतदार संघ कन्नड विधानसभा मतदारसंघ. कन्नड मतदार संघ काळभुई, घाटमाथा आणि खानदेशपट्टा या तीन भूप्रदेश भागात मोडला जातो. गेल्या दहा वर्षापासून या मतदारसंघाचं आमदार म्हणून नेतृत्व करत आहेत ते आधी मनसे नंतर शिवसेना मग एकला चलो रे करत स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन करणारे हर्षवर्धन जाधव. कन्नड मतदारसंघ राजकीय पटलावर नेहमीच चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे. इथले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पहिला राजीनामा दिला आणि चर्चेत आले. हा त्यांचा आमदारकीचा काही पहिला राजीनामा नव्हता यापूर्वी देखील त्यांनी वेगवेगळ्याा कारणासाठी तीन वेळा राजीनामा सुपूर्त केला होता.



 

मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आमदारकीचा राजीनामा देणे असो वा राजीनामा स्वीकारावा म्हणून वृत्तपत्रातून जाहिरात प्रसिध्द करणे यावरूनही हर्षवर्धन चर्चेत राहिले.

या मतदारसंघाची जातीय समीकरणे पाहायची झाली तर मराठा आणि ओबीसी समाजाची संख्या लक्षणीय आहे .त्यापाठोपाठ बंजारा माळी, मुस्लिम आणि इतर जाती धर्माच्या लोकांचा देखील या मतदारसंघांमध्ये प्राबल्य आहे.

 

हर्षवर्धन जाधव यांचे वडील रायभान जाधव आणि मातोश्री तेजस्विनी जाधव या दोघांनीही या मतदारसंघातून आमदारकी भूषवली आहे. मात्र हर्षवर्धन जाधव मनसेतून शिवसेनेत आणि आता स्वतःचा राजकीय पक्ष त्यांनी उभा केला आहे. त्यामुळे इथले राजकीय रंग बदलतात की पुन्हा एकदा कन्नडचे लोक आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    

तब्बल 240 गावं या मतदारसंघात आहेत. रायभान जाधव यांची तीन टर्म, त्यानंतर तेजस्वीनी जाधव यांची टर्म, यांच्यामुळे जाधवांचा हा तसा परंपरागत मतदारसंघ. अपवादाने 1999 मध्ये काँग्रेसच्या नितीन पाटील आणि 2004 मध्ये शिवसेनेच्या नामदेव पवार यांनी आमदारकी भूषवली. पण सत्तेचा आणि जाधवांचा हा दुरावा 10 वर्षांनी संपवला तो मनसेच्या तिकीटावर उभ्या राहिलेल्या हर्षवर्धन जाधवांनी. जाधव 5 वर्ष मनसे तर सध्या शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आलेले जरी असले तरी त्यांनी आता स्वतःचा शिवस्वराज बहुजन पक्ष स्थापन करून स्वतःची वेगळी चूल मांडली आहे. यावेळेस हर्षवर्धन जाधव स्वतःच्या पक्षातून निवडणूक लढवणार आहेत. मात्र यावेळेस ही निवडणूक त्यांना म्हणावी तशी सोपी जाणार नाही असेच चित्र दिसत आहे. यावेळी मतदारसंघातील लढत चौरंगी होण्याची शक्यता आहे.


 

2 लाख 75  हजार मतदार असलेल्या या मतदारसंघात 2009 आणि 2014 ची आकडेवारी पाहता, हर्षवर्धन जाधव यांना 2009  मध्ये 46,106  तर 2014 मध्ये  62,542 मतं पडली होती. तर राष्ट्रवादीचे उदयसिंग राजपूत यांना 2009 साली 41,999 मतं पडली होती आणि 2014 साली 60, 981 इतकी मत पडली होती. त्यांना केवळ 1561 मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. आता हेच उदयसिंह राजपूत शिवसेनेत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. उदयसिंह राजपूत यांचा स्वतःचा काही ठराविक मतदार आहे, तो राजपूत ज्या पक्षात जातील तेवढी मदत त्यांना पडत असतात. शिवाय यावेळी त्यांच्या पाठीमागे शिवसेनेकडून तिकीट मिळालं तर शिवसेनेचेही ताकत असेल, त्यामुळेच या मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध हर्षवर्धन जाधव अशीच लढाई पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण शिवसेनेकडून या मतदारसंघातून अनेक नेते इच्छुक आहेत ज्यामध्ये केतन काजे ,मारोती राठोड यांची नावे देखील आघाडीवर आहेत. शेवटी शिवसेनेने कुणाला तिकीट देते यावरून या मतदारसंघाचे सेनेचे भवितव्य अवलंबून असेल. शिवाय खासदार खैरे हे देखील या मतदारसंघात प्रचारासाठी उतरतील. कारण केवळ हर्षवर्धन जाधव हे लोकसभा निवडणुकीमध्ये उभा राहिले त्यामुळे खैरे यांचा पराभव झाला याची सल खैरे यांच्या मनात आहेच.

 

काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येतो. गेल्या वीस वर्षापासून काँग्रेसला हा मतदारसंघ काही परत मिळवता आला नाही. असं असलं तरी काँग्रेस कडूनही अनेक जण हा मतदारसंघ लढू इच्छितात. ज्यामध्ये नामदेव पवार, नितीन पाटील, संतोष कोल्हे यासह अन्य नेत्यांची नावे आघाडीवर आहेत.

 

या मतदारसंघातून वंचितला देखील चांगली मते मिळाली आहेत. त्याबरोबरच गेल्या काही दिवसापूर्वी बंजारा समाजाच्या काही संघटनांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मुस्लिम बंजारा समाजाच्या मतांची मोट बांधून वंचित एमआयएम देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवेल. पण त्यांना इथे यश मिळवणं सध्याची मतांचे समीकरणे पाहता जरा अवघड दिसत आहे.

 

लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी कोणाला पसंती दिली होती?

 

 चंद्रकांत खैरे यांना सर्वाधिक 73 हजार 988 मते मिळाली होती .

 

अपक्ष म्हणून उभा असलेले हर्षवर्धन जाधव यांना 69 हजार 374 मते मिळाली

 

एमआयएमचे इम्तियाज जलील यांना 34 हजार 263 मतं

 

काँग्रेसचे सुभाष झांबड यांना 11 हजार 185 मते मिळाली होती.

 

मतदारांच्या बाबतीतही 'कही खुशी कही गम' असेच चित्र आहे. जाधव घराण्याला पारंपरिक मतांचा फार मोठा आधार आहे. पण काही नागरिक मात्र जाधव विकासकामांत अपयशी ठरल्याचा आरोप करताय. आमदारांनी काम केले आणि काम नाही केले असे दोन्ही बाजूने बोलणारे लोक या मतदार संघात आहेत. एकूणच मतदारसंघाचा विचार करता काही महत्वाच्या समस्या या निवडणुकीत महत्त्वाच्या ठरणार आहे.

 

गौताळा सारखे अभयारण्य, दोन किल्ले असूनही मोठं पर्यटन केंद्र होऊ शकले नाही. शहराअतर्गत आणि ग्रामिण भागात रस्त्यांचे जाळे फारच तोकडे आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे, शिवना टाकळी प्रकल्प जवळ असूनही ते पाणी कन्नडपर्यंत पोहोचू शकले नाही.

 

2014 मध्ये उमेदवारांना मिळालेली मते

 

हर्षवर्धन जाधव (शिवसेना) 62543

 

उदयसिंग राजपूत (राष्ट्रवादी) 60981

 

डॉ. संजय गव्हाणे (भाजप) 28037

 

नामदेवराव पवार (काँग्रेस) 21865

 

लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज हर्षवर्धन जाधव यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात उभा होता. त्यामुळे अपक्ष उभा राहून देखील त्यांना अडीच लाखापेक्षा अधिक मते मिळाली होती.

 

विधानसभा निवडणुकीमध्ये  मराठा समाज हर्षवर्धन जाधव यांच्या पाठीमागे उभा राहतो का?

 

वंचित मध्ये जाणार असल्याची मध्यंतरी चर्चा सुरू होती त्याचा फटका देखील त्यांना बसतो का?

 

याशिवाय वडिलांपासून या मतदारसंघांमध्ये जो मतदार जाधव कुटुंबीयांच्या मागे उभा असतो तो मतदार या निवडणुकीमध्ये उभा राहणार का?

 

यासोबतच उदय सिंग राजपूत यांचा स्वतःचा मतदार आणि शिवसेनेचे पाठबळ किती मिळतं? त्यांना तिकीट मिळतं का नाही?

 

या सगळ्यावर या मतदार संघाचे भवितव्य अवलंबून असेल. हर्षवर्धन जाधव आणि खैरे यांच्या आरोप-प्रत्यारोप यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील लढत चांगलीच चुरशीची बनली होती. यामुळे चंद्रकांत खैरे यांचा पराभव देखील झाला होता. आता या मतदारसंघात नेमकं काय होणार याकडे अवघ्या जिल्ह्याचे नाही तर राज्याचे लक्ष लागलेलं असणार आहे. त्यामुळे या मतदारसंघाची निवडणूक निश्चितच चुरशीची होईल यात काही शंका नाही.