Dharashiv: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आमदारांच्या मुंबईत चकरा वाढल्या आहेत.  मुंबईत  आता राज्यात मराठवाड‌्यात कोणत्या आमदारांना मंत्रीपदाची ऑफर महायुती सरकार देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. दरम्यान, धाराशिवमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत महायुतीचं संख्याबळ एका आमदारानं घटलं आहे. यावेळी उमरग्याची जागा हातून गेल्याने महायुतीला दोन जागांवरच यश मिळालं. या दोन्ही जागेवरील विजयी उमेदवार हे मंत्रिपदाच्या रेसमध्ये असून, कोणाच्या गाडीवर लाल दिवा लागणार याची सध्या एकच चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे. एकीकडे शिवसेनाफुटीनंतर शिंदे गटाचे तानाजी सावंत कॅबिनेटमध्ये गेले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना पुन्हा नामदार करण्याचे जाहीर आश्वासन सभेतून दिले होते.  तर दुसरीकडे विधानपरिषदेची एक व विधानसभेची तिसरी टर्म पदरी पडलेले आमदार राणाजगजितसिंह पाटील हे ही तगडे स्पर्धक आहेत. ते भाजपकडून निवडून आले असून, धाराशिवमध्ये दुसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलवले आहे. त्यामुळे एकाच जिल्ह्यात शिंदे गटाच्या आमदाराला मंत्रीपद मिळणार, भाजपच्या आमदाराला मंत्रीपद देणार की दोघांच्या गाड्यांवर लाल दिवा बसणार याची चर्चा रंगली आहे.

Continues below advertisement

मागच्या विधानसभा निवडणुकीत धाराशिवमध्ये चारही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जिंकले होते. मात्र, महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर एकाही आमदाराच्या पदरात मंत्रीपद पडू शकले नाही. दरम्यान, शिवसेनेत फुट पडल्यानंतर स्थापन झालेल्या महायुतीत  तानाजी सावंत कॅबिनेट मंत्री झाले. निकालात शिंदेसेनेच्या हातून उमरग्याची जागा निसटली. उस्मानाबादेतही पराभव झाला. परंड्यात सावंत हे काठावर पास झाले. त्यामुळे शिंदेसेनेकडे सध्या सावंत हेच एकमेव आमदार जिल्ह्यातून आहेत. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचेही ते निकटचे सहकारी म्हणून गणले जाणारे राणा जगजीतसिंह पाटील आहेत.  त्यामुळे मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दोन्ही आमदारांना मताध्यक्य किती?

राणाजगजितसिंह पाटील

मतदारसंघ: तुळजापूर

Continues below advertisement

मिळालेली एकूण मते : १,३१,८६३

मताधिक्य : ३६,८७९

तानाजी सावंत

मतदारसंघ : परंडा

मिळालेली एकूण मते : १,०३,२५४

मताधिक्य: १,५०९

या बाजू ठरणार अडचणीच्या ?

तानाजी सावंत यांचा बेधडक स्वभाव, मागच्या टर्ममध्ये मंत्री असताना झालेले त्यांच्यावर झालेले आरोप, पालकमंत्री असतानाही जिल्ह्यातील इतर दोन उमेदवारांसाठी अपुरे पडलेले बळ, मित्रपक्षांकडून होणारा सुप्त विरोध या बाजू सावंत यांच्यासाठी अडचणीच्या असल्याचे सांगितले जात आहे. तर राणाजगजितसिंह पाटील यांच्या पक्षात मंत्रिपदासाठी असलेली इच्छुकांची गर्दी, मतदारसंघाच्या लगतच्याच निलंगा, औसा, लातूर ग्रामीणमधील भाजपच्या आमदारांचा मंत्रिपदासाठी असणारा आग्रह, या बाजू अडचणीच्या ठरू शकतात.