अहमदनगर : अहमदनगरमध्ये राजकारण वेगळ्याच दिशेला जात असून आज नगर तालुक्यातील महाआघाडी म्हणजेच काँग्रेस, शिवसेना आणि इतर मित्र पक्ष यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे.


नगर तालुका काँग्रेस, शिवसेना महाआघाडीने आज भव्य मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये शिवसेनेसह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी सामील झाले होते. यावेळी काँग्रेस आणि शिवसेना महाआघाडीने लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचं काम करण्याचा निर्धार केला आहे.

अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीत सुजय विखे, त्यांच्या मातोश्री जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे आणि राधाकृष्ण विखे यांनी नगर तालुक्यामध्ये शिवसेना-काँग्रेस आघाडीला मदत केली होती. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस-सेने महाआघाडी सुजय विखे यांना मदत करणार असल्याचे काँग्रेस जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हाराळ यांनी स्पष्ट केलं. या पाठिंब्यामुळे आता राष्ट्रवादी उमेदवार संग्राम जगताप यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे अहमदनगरची जागा सोडण्याबाबत विनंती केली होती. मात्र शरद पवार सुजय विखे यांचं महाआघाडीत योगदान काय? असा सवाल उपस्थित केला होता. शिवाय जागेचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मध्यस्थी करणार असल्याचीही माहिती होती. मात्र शेवटपर्यंत जागेचा तिढा न सुटल्याने सुजय विखेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

संबंधित बातम्या

राष्ट्रवादीचा काटशह, अहमदनगरमधून सुजय विखेंविरोधात संग्राम जगतापांना तिकीट

काँग्रेसला धक्का, सुजय विखे पाटील यांचा भाजपात प्रवेश