बंगळुरु : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांची जीभ वारंवार घसरताना दिसत आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचाही समावेश झाला आहे. "लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 40 पेक्षा कमी जागा मिळण्याचा पंतप्रधान मोदींचा अंदाज चुकला तर ते दिल्लीच्या विजय चौकात फाशी घेणार का?" असा सवाल खर्गे यांनी विचारला. कर्नाटकातील चिंचोळी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार सुभाष राठोड यांच्या प्रचारसभेत मल्लिकार्जुन खर्गे बोलत होते.


मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, "मोदी जिथे जातात, तिथे बोलतात की लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 40 जागाही मिळणार नाही. तुमच्यापैकी कोणाला तरी असं वाटतं का? जर आम्हाला 40 जागा मिळाल्या तर मोदी दिल्लीच्या विजय चौकात फाशी घेतील?" विशेष म्हणजे 2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 44 जागा मिळाल्या होत्या.


मोदींची तुलना हिटलरशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची मल्लिकार्जुन खर्गे यांची ही पहिली वेळ नाही. याआधी खर्गे यांनी मोदींची तुलना जर्मनीचा हुकूमशाह हिटलरशी केली होती. मुंबईत आयोजित कार्यक्रमात खर्गे म्हणाले होते की, "हिटलरने ज्याप्रमाणे जर्मनीत हुकूमशाही आणली तसंच काहीसं मोदींना भारतात करायचं आहे. संविधान धोक्यात आहे आणि आपल्याला भाजपच्या या प्रयत्नांना खीळ घालायला हवी."

तर आणखी एका सभेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींवर निशाणा साधला होता. "मोदी स्वत:ला मागास जातीचे असल्याचं सांगतात, पण ते केवळ श्रीमंतांचीच मदत करत आहेत," असं खर्गे म्हणाले होते.

खर्गेंनी माफी मागावी : भाजप
भाजपचे ज्येष्ठ नेत्या आणि खासदार शोभा करंदलाजे यांनी या विधानाप्रकरणी खर्गे यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. "एवढ्या ज्येष्ठ नेत्याकडून अशा अशोभनीय विधानाची अपेक्षा नव्हती," असं त्या म्हणाल्या.



उमेश जाधवांच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणूक
विद्यमान उमेदवार उमेश जाधव यांच्या राजीनाम्यानंतर चिंचोळी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. उमेश जाधव यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता ते गुलबर्गामधून लोकमसभा निवडणूक लढवत आहेत.