Kolhapur Election 2022 : कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी एकूण 2 हजार 142 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, एकूण 357 केंद्रांवर ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदानाच्या प्रक्रियेसाठी 357 ईव्हीएम मशीन (EVM Machine) ठेवण्यात आलेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात एकूण 7 संवेदनशील मतदान केंद्रं आहेत. एकूण 550 पोलीस कर्मचाऱ्यांचा फोजफाटा तिथे तैनात करण्यात आला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत 80 वर्षांच्या आणि दिव्यांग नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच मत नोंदवण्यात आलं होतं. तसाच प्रयोग आता या निवडणुकीत केला जाणार आहे.


महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) काँग्रेसच्या जयश्री पाटील या निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून सत्यजित कदम निवडणुकीच्या रिंगणात आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात आला असून, दोघांनीही विजयाचे दावे केले आहेत.


रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिग्गज नेत्यांच्या राजकीय सभा कोल्हापुरात पार पडल्या. शेवच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जनतेला संबोधीत केलं. यावेळी त्यांनी कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव निवडून येणार हे नक्की असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. खोटं बोल पण रेटून बोल ही विरोधकांची रणनीती आहे. भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही, भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. 


तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनीही प्रचारसभा घेत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.  कोल्हापुरात मंत्री मोठ्या प्रमाणात दहशत माजवत आहेत. ही दहशत मतदार मोडून काढतील आणि भाजपला मतं देतील. महाविकास आघाडीबद्दल नागरिकांत संताप आहे. महापुरात हे सरकार काही देऊ शकले नाही.  कोल्हापूरच्या विकासात महाविकास आघाडीचे काय योगदान आहे? येथील मंत्र्यांमुळे कोल्हापूरकरांचा पूर्ण भ्रमनिरास झाला असल्याची टीका फडणीवस यांनी केली.


दरम्यान, कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. दोघांनीही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला होता. फडणवीसांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री ठाकरेंनी सडेतोड उत्तरं दिली होती. आज सर्व उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर पोटनिवडणूकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.