Karnataka Election Results 2023 : कर्नाटकात आज (13 मे) विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Assembly Election 2023) निकालाचा दिवस आहे. कर्नाटकातील 36 मतमोजणी केंद्रांवर 224 विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी सुरु आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये, सत्ताधारी भाजपचा (BJP) पराभव करुन काँग्रेस (Congress) बहुमतासह सत्तेवर येताना दिसत आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपला 80 पेक्षा कमी जागांवर आघाडीवर आहे.


कर्नाटक निवडणुकीच्या कलांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या संपूर्ण बहुमतासोबतच विजय-पराजयाच्या कारणांचीही चर्चा सुरु झाली आहे. कर्नाटकात भाजपच्या लाजिरवाण्या पराभवामागे मजबूत चेहऱ्याचा अभाव आणि राजकीय समीकरणे सांभाळण्यात आलेले अपयश ही प्रमुख कारणे असल्याचं समोर येत आहेत.


जाणून घेऊया भाजपच्या पराभवाची सहा कारणे


1. कर्नाटकात मजबूत चेहऱ्याचा अभाव


कर्नाटकमध्ये भाजपच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे मजबूत चेहऱ्याचा अभावा. बीएस येडियुरप्पा यांच्या जागी भाजपने बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री बनवले असेल, पण मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर असतानाही बोम्मई यांचा विशेष प्रभाव पडला नाही. तर काँग्रेसकडे डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यासारखे मजबूत चेहरे होते. निवडणुकीत प्रमुख चेहरा म्हणून बोम्मई यांची निवड करणं भाजपला महागात पडलं.


2. भ्रष्टाचार 


भाजपच्या पराभवामागे भ्रष्टाचाराचाही मुद्दा होता. काँग्रेसने सुरुवातीपासूनच भाजपच्या विरोधात '40 टक्के कमिशन सरकार' हा अजेंडा ठरवला आणि तोच हळूहळू मोठा मुद्दा बनला. एस ईश्वरप्पा यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि भाजपच्या एका आमदाराला तुरुंगात जावे लागलं. राज्य कंत्राटदार संघटनेने पंतप्रधानांकडे तक्रारही केली होती. निवडणुकीतही हा मुद्दा भाजपसाठी अडचणीचा ठरला आणि पक्षाला त्यावर तोडगा काढता आला नाही.


3. राजकीय समीकरण राखण्यात भाजपला अपयश


कर्नाटकचे राजकीय समीकरणही भाजपला राखता आले नाही. भाजपला आपली मूळ व्होट बँक लिंगायत समाजासोबत ठेवता आली नाही किंवा दलित, आदिवासी, ओबीसी आणि वोक्कलिंगा समाजाची मने जिंकता आली नाहीत. दुसरीकडे, मुस्लीम, दलित आणि ओबीसींना घट्ट बांधून ठेवण्यात, तसंच लिंगायत समाजाची मतं मिळवण्यात काँग्रेसला यश आलं आहे.


4. ध्रुवीकरणाचा डाव फसला


कर्नाटकातील भाजप नेते एक वर्ष हलाला, हिजाबपासून अजानपर्यंतचे मुद्दे मांडत राहिले. गेल्या निवडणुकीच्या वेळी बजरंग बलीचाही प्रवेश झाला होता, पण धार्मिक ध्रुवीकरणाचे हे प्रयत्न भाजपच्या कामी आले नाहीत. काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिलं असताना, भाजपने बजरंग दलाला थेट बजरंगबलीशी जोडलं आणि हा सारा मुद्दा देवाचा अपमान असल्याचा दावा केला. निवडणुकीत भाजपने हिंदुत्वाचे कार्ड खेळले, पण हा डावही त्यांना पराभवापासून वाचवू शकला नाही.


5. येडियुरप्पांसह दिग्गज नेत्यांना बाजूला करणं महागात


कर्नाटकात भाजपच्या बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना या निवडणुकीत साईडलाईन करण्यात आलं. सोबतच माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना भाजपने तिकीट नाकारलं. यानंतर दोन्ही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरले. येडियुरप्पा, शेट्टर, सवदी हे तिघेही लिंगायत समाजाचे मोठे नेते समजले जातात, ज्यांच्याकडे दुर्लक्ष करणं भाजपला महागात पडलं.


6. सत्ताविरोधी लाटेला काऊंटर मिळाला नाही


कर्नाटकात भाजपच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे सत्ताविरोधी लाटेला काऊंटर न मिळणं हे देखील आहे. भाजपची सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजी होती, सत्ताविरोधी लाट उसळली होती, ज्याला सामोरं जाण्यात भाजपला पूर्णपणे अपयश आलं.