नागपूर : नागपुरातून 5 लाखानी निवडणूक जिंकलो नाही तर राजकीय संन्यास घेईल असा दावा करणाऱ्या नाना पटोले यांनी पराभवानंतर घुमजाव केला आहे. पराभवानंतर राजकीय संन्यास घेणे हा माझा जुमला असल्याचं वक्तव्य काँग्रसचे नेते नाना पटोले यांनी केलं आहे. तुम्ही गडकरी आणि इतर नेत्यांचे शंभर जुमले ऐकता मग माझ्या एका जुमल्यावर मला प्रश्न का विचारता असा प्रतिप्रश्नच नाना पटोले यांनी पत्रकारांना विचारला.


आज नागपुरात नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकारी अश्विन मुद्दल यांच्यावर आगपाखड केली. त्यावेळी पत्रकारांनी नाना पटोले यांना 5 लाखांनी निवडणूक जिंकण्यांसदर्भात त्यांच्या दाव्याबद्दल आणि राजकीय सन्यास सन्यास घेण्याच्या घोषणेबद्दल प्रश्न विचारले असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Nana Patole | गडकरींविरोधात पाच लाख मतांनी जिंकणार, नाना पटोलेंना विश्वास | नागपूर | ABP Majha



नितीन गडकरी यांनी यापूर्वीही अनेक घोषणा केल्या आहेत मात्र त्याही त्यांनी पूर्ण केल्या नसल्याचे सांगत नाना पटोलेंनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. गडकरीही पाच लाखांनी निवडणूक जिंकण्याचा दावा करत होते, मग ते चार लाखांवर आले मात्र, जिंकले का? असा सवाल देखील पटोलंनी उपस्थित केला.

गेल्या निवडणुकीच्या वेळी गडकरीनी वेगळ्या विदर्भाला पाठिंबा जाहीर केलेला मात्र, नंतर त्यांनी शब्द फिरवला. त्यांचे शंभर जमले तुम्हाला चालतात मग मला एका जुम्ल्याबद्दल का प्रश्न विचारता असा अजब तर्क नाना पटोले यांनी पुढे केला. दरम्यान, मी राजकीय संन्यास मुळीच घेणार नाही. मी नागपूरच्या जनतेसाठी लढा देत राहीन असं ही नाना पटोले म्हणाले.

नागपूरचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुद्गल निवडणुकीत तानशाह सारखे वागले. त्यांना आम्ही न्यायालयात खेचू असंही नाना पटोले म्हणाले. माझ्या अंगावर कोणी आले तर त्याला शिंगावर घेण्याची माझी सवय आहे. आता जिल्हाधिकारी मुद्दल यांना न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून शिंगावर घेऊ असे पटोले यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी शासनाचे प्रतिनिधी आणि त्याच्या धोरणांचे प्रतिबिंब असतात. मात्र मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील हे जिल्हाधिकारी तानशाह आहेत. त्यांची वागणूक दडपशाहीची आहे. याच्यावरुनच लक्षात येते की फडणवीस सरकार कसे असेल. त्यांनी माझ्यावर गुन्हे दाखल केले आहे, पुढे ही करावे, खुशाल तुरुंगात टाकावे. मात्र, त्यांना न्यायालयात उत्तर द्यावे लागेल असेही नाना पटोले म्हणाले.

VIDEO | नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस लालची इंद्र : नाना पटोले | नागपूर | एबीपी माझा