Himachal Pradesh Election Result 2022: गुजरातमध्ये दणदणीत विजय (Gujarat election result 2022) मिळवत भाजपनं (BJP) इतिहास रचलाय. पण हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh Result 2022) भाजपला सत्ता राखण्यात अपयश आले आहे.  हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसनं बहुमत मिळवलं आहे. काँग्रेसने 40 जागांवर बाजी मारली आहे तर भाजपला 25 जागांवर समाधान मानावं लागलेय. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला 43.9 टक्के मतं मिळाली आहेत तर भाजपला 43 टक्के मते मिळाली आहेत. आप पक्षाला 10.4 टक्के मते मिळाली आहेत. 


विजय मिळाला पण घोडेबाजाराची भिती कायम - 
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसनं एकहाती सत्ता स्थापन केली आहे. काँग्रेस पक्षाला विजयाचा आनंद आहे पण घोडोबाजाराची भिती कायम आहे. ऑफरेशन लोट्सची भिती काँग्रेसला आहे, त्यामुळे आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेय.  छत्तीसगढचे मुख्यमंत्री बूपेश बघेल म्हणाले की, भाजप कोणत्याही स्तराला जावू शकते. त्यामुळे आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवावं लागेल. 


ऑपरेशन लोट्सची का भिती?


गेल्या काही वर्षात पाहिलं तर काँग्रेसला काही राज्यात सत्तेतून बाहेर बसावं लागलं. नुकतेच महाराष्ट्रात काय झालं ते देशानं पाहिलं. शिवसेनेच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं. 


2018 मध्ये मध्य प्रदेशात 15 वर्षानंतर काँग्रेस सत्तेत आली होती. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर काँग्रेसच्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड केला. याचा भाजपनं फायदा घेत सत्ता स्थापन केली. 


2017 मध्ये मणिपूरमध्ये काँग्रेसनं निवडणूक जिंकली होती. काँग्रेसकडे 28 तर भाजपकडे 21 जागा होत्या. पण काँग्रेसमधून बंडखोरी झाली अन् याचा फायदा भाजपनं घेतला. 


2017 मध्ये गोव्यातही असेच झालं होतं. काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावं लागलं. 10 आमदारांनी एकत्र राजीनामा दिला. येथेही भाजपनं सत्ता स्थापन केली.


2016 मध्ये उत्तराखंडमध्ये काँग्रेस सरकारच्या 9 आमदारांनी बंडखोरी केली. राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली. या 9 आमदारांच्या मागे भाजपचा हात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर काही दिवसांनी त्या 9 बंडखोर आमदारांनी भाजपात प्रवेश केला.  


हिमाचलमध्ये सत्ताबदलाची प्रथा कायम
हिमाचल प्रदेशमधील जनतेनं सत्ताबदलाची प्रथा कायम ठेवली आहे. पाच वर्षांनंतर काँग्रेस (Congress) पुन्हा सत्तेत आली आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला 35 जागांची आवश्यकता असते. भाजपच्या पराभवानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Jairam Thakur) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.


भाजपचा पराभव का झाला?
हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री बदलण्याची मागणी भाजपमध्ये होती, पण पक्षानं याकडे दुर्लक्ष केले. अंतर्गत कलहाचा फटका भाजपला हिमाचल प्रदेशमध्ये बसल्याचे जाणकरांचं मत आहे. भाजपचे स्टार प्रचारक केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक मंत्री हिमाचल प्रदेशमध्ये तळ ठोकून होते. तरिही भाजपला सत्ता राखण्यात अपयश आले. गुजरातमध्येही मुख्यमंत्री बदलावरुन भाजपमध्ये कलह होता, भाजपने गुजरातमध्ये विजय रुपाणी यांच्याऐवजी भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री केले, याचा फायदा भाजपला झाल्याचं दिसलं. पण हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री न बदलल्याची  चूक भाजपला महागात पडल्याचे तज्ज्ञांचं मत आहे.