मुंबई : राज्यातील चौथ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. यामध्ये मुंबईतील सहा जागांचा देखील समावेश आहे. राज्यासह देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु असताना मुंबईतील उमेदवार देखील अभिनव पद्धतीने प्रचार करत आहेत.


अशाच प्रकारे प्रचार करत असताना मुंबईतील उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम वादात सापडण्याची चिन्हे आहेत.  प्रचाराच्या दरम्यान मुंबईतील प्रसिद्ध जय गोविंदा पथकाने काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांना सात थर लावून अभिवादन केलं आणि त्यांचं स्वागत केलं.



गोविंदा पथकाने रात्री दहा वाजेनंतर सलामी दिल्याने निवडणूक अधिकारी नियमभंग झाला म्हणून कारवाई करतील का? हा प्रश्न आहे.  गोविंदा पथकाने आम्ही फक्त स्वागत केलं, ही आमची स्वागताची पद्धत आहे. आमचा कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही, हे स्पष्ट केलं आहे तर दुसरीकडे निरुपम यांनी सांगितलं की, मी या ठिकाणी मतं मागितली नाहीत, त्यामुळे नियमभंग झालेला नाही, असं कारण दिलं आहे.

जय जवान हे मुंबईतील नऊ थर लावून वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं गोविंदा पथक आहे.