मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाण्यासाठी नेत्यांची रांग लागलेली पाहायला मिळत आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं भगदाड पडण्याची शक्यता आहे. कारण, मुंबईतल्या गरवारे क्लबमध्ये 31 जुलै रोजी राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.


शिवेंद्रराजे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरु झाल्यानंतर ते बाहेर पडणार नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. मात्र शिवेंद्रराजे यांचा प्रवेश होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.   शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद मिटवण्याचे प्रयत्न खुद्द शरद पवार यांनी केले होते. मात्र वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. अखेर शिवेंद्रराजे यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

दुसरीकडे नवी मुंबईतील आमदार संदीप नाईक देखील भाजप प्रवेश करणार आहेत. त्यांच्या सोबत महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व 52 नगरसेवक देखील राजीनामा देऊन भाजपमध्ये डेरेदाखल होणार आहेत, अशीही माहिती आहे.  त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आता काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता जाऊन शिवसेना भाजपची सत्ता अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तर राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक मधुकर पिचड आणि अकोले मतदारसंघाचे आमदार वैभव पिचड यांनी देखील भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. तेही 31 जुलैला प्रवेश करणार आहेत.  आयुष्यात काही निर्णय घ्यायचे असतात. गेल्या 35 वर्षात मधुकर पिचड यांनी खूप काम केले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला आम्ही भक्कम साथ दिली. माझ्या आमदारकीपेक्षा जास्त मतं यावेळी दिली. मात्र गेल्या पाच वर्षांपासून अकोले तालुक्याचा विकास रखडला असून रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक विकासाच्या योजना विरोधी पक्षात असल्यानं पूर्ण होत नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला यश मिळालं आणि आगामी विधानसभेत हेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल अशी भावना कार्यकर्त्यांची झाली असून तालुक्याचा विकास व्हावा ही जनतेची भावना ओळखून भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं आमदार वैभव पिचड यांनी सांगितलं होतं.

तर  काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कोळंबकर यांनी आजच आपला राजीनामा प्रदेशअध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुपूर्त केला आहे.  'मी काँग्रेसवर नाराज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं कौतुक केलं म्हणून मला पक्षाने बाहेर केलं' असं म्हणत कालिदास कोळंबकरांनी मागेच भाजप प्रवेशाची घोषणा केली होती.  कोळंबकर मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मुंबईतील पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहा वेळा कोळंबकर विधानसभेवर निवडून आले आहेत.