मुंबई : 'सोनिया गांधी, राजीव गांधी यांच्या काळात काँग्रेस पक्ष ज्या विचारानं चालत होता तसा आता राहिलेला नाही,' अशी खंत दिंवगत वसंतदादा पाटील यांचे नातू माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांनी व्यक्त केली आहे. सांगली लोकसभेची जागा शेतकरी संघटनेला दिल्यानंतर नाराज झालेल्या प्रतिक पाटील यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.


काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रतिक पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या नेतृत्त्वावर नाराजी व्यक्त केली आहे. "सध्याचा काँग्रेस पक्ष हा सोनिया गांधी, राजीव गांधी यांच्या काळातला पक्ष राहिला नाही. सोनिया गांधींनी माझ्यावर विश्वास टाकला होता. काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी राहुल गांधींना यांना भेटण्यासाठी वारंवार प्रयत्न केले पण त्यांनी वेळ दिली नाही", असं म्हणत प्रतीक पाटील यांनी थेट राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. 'ब्रेकफास्ट न्यूज' या एबीपी माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.



'सांगलीच्या जागेबाबत निर्णय घेत असताना इथल्या नेत्यांना विचारात घ्यायला हवं होतं आणि ही जागा काँग्रेसकडे ठेवायला हवी होती', असं प्रतिक पाटील म्हणाले. "आम्ही सर्वांनी मिळून विशाल पाटील यांना संधी द्यावी म्हणून पक्षश्रेष्ठींकडे त्यांचं नाव दिलं होतं. मात्र आमची मागणी विचारात घेतली गेली नाही. तसेच सांगलीच्या जागेचा निर्णय झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजू शेट्टी यांनी ही जागा त्यांना सोडण्यात आली असल्याची माहिती दिली मात्र काँग्रेसकडून आम्हाला काहीही कळवण्यात आलं नव्हतं", अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

प्रतिक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणं हा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि महाआघाडीला हा मोठा धक्का मानला जातो. प्रतिक पाटील यांनी आपण भाजपमध्ये जाणार नाही असं जाहीर केलं आहे.