निवडणुका खुल्या, मुक्त आणि निर्भर वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधित मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात येते. तसेच मतदानापूर्वीचे 48 तास आणि मतमोजणीच्या दिवसाचे 24 तास मद्यविक्री करण्यात येणारी दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विदेशी मद्य, देशी दारू, ताडी दुकाने यांना हा आदेश लागू असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांची अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल. आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे निर्देश दिले आहेत.
तीन दिवस कोरडा दिवस म्हणून जाहीर करण्याबाबत लोकप्रतिनिधी अधिनियम, 1951 च्या कलम 135(सी) अन्वये तरतूद करण्यात आली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी 48 मतदारसंघामध्ये एकूण 4 टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी 7 मतदारसंघासाठी, दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी 10 मतदारसंघासाठी, दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी 14 मतदारसंघासाठी आणि 29 एप्रिल 2019 रोजी 17 मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. मतमोजणी 23 मे 2019 रोजी होणार आहे.