आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाराष्ट्रात 112 कोटींचा काळा पैसा जप्त
एबीपी माझा वेब टीम | 16 Apr 2019 08:28 AM (IST)
दहा मार्च 2019 ला देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून महिन्याभराच्या कालावधीत महाराष्ट्रातून 112 कोटी रुपये किमतीचा काळा पैसा जप्त करण्यात आला आहे.
मुंबई : निवडणूक आयोगाकडून महिन्याभरात महाराष्ट्रातून मोठं घबाड जप्त करण्यात आलं आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर 112 कोटी रुपयांचा काळा पैसा ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यानंतर काळ्या पैशाच्या 'हेराफेरी'ला लगाम लागवण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. दहा मार्च 2019 पासून महिन्याभराच्या कालावधीत या पथकाने राज्यातून 112 कोटी रुपये किमतीचा काळा पैसा जप्त करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाने कारवाईत 40.81 रुपयांची रोकड, 44.76 कोटी रुपयांची सोनं-चांदी जप्त करण्यात आली आहे. तर 21.24 कोटी रुपयांचं मद्य, 6.12 कोटी रुपयांच्या ड्रग्जचाही यामध्ये समावेश आहे. पैसे आणि मद्याच्या आमिषाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही 'हेराफेरी' होत असल्याचं निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र हा पैसे कुठून कुठे जात होता, याची नेमकी माहिती उपलब्ध झालेली नाही. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा असल्यामुळे निवडणूक आयोगासह कस्टम, आयकर विभागाची यावर नजर आहे. मुंबईमध्ये चौथ्या टप्प्यात म्हणजेच 29 एप्रिलला मतदान होणार आहे. तोपर्यंत काळा पैसा आणि मद्याची ने-आण वाढण्याची शक्यताही आयोगाने वर्तवली आहे.