मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे दोन नातू, रोहित पवार आणि पार्थ पवार. पवारांच्या तिसऱ्या पिढीतील कोणत्या नातवाला संधी मिळणार रोहित की पार्थ? या चढाओढीची परिणीती अशी झाली की शरद पवार यांनी 2019 लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली.


शरद पवार यांचा कल हा नेहमी रोहित पवार यांच्या बाजूने झुकताना दिसतो. गेल्या काही महिन्यात रोहित पवार यांचं महाराष्ट्रात फिरणं, लोकसभा निवडणुकीच्या घडामोडीबाबत काही नेत्यांच्या भेटीगाठी यामुळे रोहित बरेच चर्चेत आहेत. त्यात 2019 विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवार यांची तयारी पाहून अजित पवार यांच्या गोटात अस्वस्थता होती.

शरद पवार यांची माढा मतदारसंघातून माघार

या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांची संधी हुकली तर विधानसभा निवडणुकीत रोहित पवार निवडणूक जिंकून पक्षात त्याच महत्त्व वाढेल आणि पार्थला अजून पाच वर्षे वाट पाहावी लागेल, अशी चिंता अजित पवारांच्या गोटात होती. यासाठी पार्थ पवार यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी लोकसभा निवडणूक लढवणं गरजेचं होतं.

पवार घराण्यातील दोन जण निवडणूक लढवणार असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. मात्र पार्थ पवारांनी निवडणूक लढवावी यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अजित पवार, कुटुंबीय आणि अजित पवार समर्थक पक्षातील नेत्यांनी प्रयत्न केले होते. याची परिणीती अशी झाली की शरद पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली.



साहेब, आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करा, नातू रोहित पवारांचं आजोबांना आवाहन

परंतु शरद पवारांनी माघार घेऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट कालपासून सक्रिय झाला आहे. आज रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्याला वाचा फोडली. शरद पवार यांनी पुनर्विचार करावा अशी फेसबुक पोस्ट रोहित पवार यांनी लिहिली.

जर शरद पवार निवडणूक लढले तर पार्थ लढणार का? की पार्थ आणि पवार दोघेही निवडणूक लढवणार या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात मिळतील. पण पवारांच्या तिसऱ्या पिढीतील चढाओढीला 2019 निवडणुकांच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. पार्थच्या मागे वडील अजित पवार आहेत तर रोहितच्या मागे आजोबा शरद पवार ठाम उभे आहेत. या दोघांमधील टक्कर या तरुण नेत्यांचं भविष्य ठरवण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

सुजय विखे पाटील भाजपच्या वाटेवर, तर राधाकृष्ण विखे पाटील...

आघाडीतील अहमदनगरचा तिढा सोडवण्यासाठी राहुल गांधी मध्यस्थी करणार

सुजय विखे पाटील राष्ट्रवादीकडून अहमदनगर लोकसभेची जागा लढवणार?