पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिनेत्री गिरीजा ओक हिने संवाद पुणेकरांची या कार्यक्रमात मुलाखत घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. या वेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं, असं म्हटलं. अजित दादा बोलतात, माझं काम बोलतं पण मला याठिकाणी सांगितलं पाहिजे की या निवडणुकीत आधी लक्षात आलं होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढता येणार नाही. दोन्ही भक्कम पार्ट्या आहेत, आम्ही एक नंबरचा पक्ष आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

Continues below advertisement

देवेंद्र फडणवीस पुढं म्हणाले की, आम्ही हे ठरवलं होतं, आपण वेगवेगळे लढतोय, मी असं सांगितलं होतं, जिथं आपण लढतोय तिथं मैत्रीपूर्ण लढती आहेत, असं समजूयात. मी आतापर्यंत संयम पाळलाय, त्यांचा संयम थोडा ढळलाय, कदाचित निवडणुकीतील स्थिती पाहून दादांचा संयम कमी झालेला वाटतोय. ते 15 तारखेनंतर नाही बोलणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

कोणताही परिवार एकत्र येत असेल तर मला आनंद आहे. राज ठाकरेंनी मला क्रेडिट दिलं याचा आनंद वाटतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं ते दोघे एकत्र येत असतील तर त्याचा आनंद मला आहे, त्याचा मला आशीर्वाद मिळेल. बहीण आणि भाऊ एकत्र आलेत का याचा अंदाज मला नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

Continues below advertisement

पुण्यातून जेवढी उडणारी विमानं आहेत तेवढ्या विमानात महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे अशी घोषणा करणार होतो, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या मोफत मेट्रो प्रवासाच्या संकल्पनेची खिल्ली उडवली. लोकांचा विश्वास बसेल, अशा घोषणा केल्या पाहिजेत. मेट्रो एकट्या राज्याची नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

मी पुणेकरांना जवळून ओळखतो, ते कर भरणारे आहेत. पुणे करांना उत्तम अशा प्रकारची मेट्रोची, बसची सेवा हवीय. ती त्यांची अपेक्षा आहे. पुण्यातील टेकड्या हिरावल्या जाणार नाहीत,टेकड्यांवर जे काही अतिक्रमण झालंय त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे. टेकड्या टिकल्या पाहिजेत, अशा मताचं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. विकास आराखडा तयार करताना पुढच्या 10 वर्षात 15 वर्षात कुठल्या झोनमध्ये विकास होऊ शकतो त्याचं झोनिंग करतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

पुण्यातील पाणी प्रश्न लवकरच सुटेल. सध्या पुण्याला पाण्याची कमतरता नाही पण पुढे जाऊन पाण्याचे स्रोत पुण्यासाठी तयार करावे लागतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.