Anil Deshmukh: नागपूर : देवेंद्र फडणवीस यांनी खोटे आरोप करत आणि वरच्या लोकांच्या मदतीने ईडी, सीबीआय लावून मला जेलमध्ये टाकलं. दरम्यान जेलमध्ये 'डायरी ऑफ होम मिनिस्टर'  (Diary of Home Minister) हे पुस्तक मी लिहिलं आहे.  यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या बाबत प्रतिज्ञापत्र करण्यासाठी त्यावेळी फडणवीस यांचा सुमित कदम नावाचा दूत आला होता. मात्र मी नकार दिल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपासून माझ्या घरी ईडी रेड झाली. ही संपूर्ण घटना कशी घडली, याबाबत मी या पुस्तकात एक्स्पोज केली आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी गलिच्छ राजकारण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलंय, असा घणाघाती आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी परत एकदा केला आहे.    


फडणवीस यांनी कोर्टाचे आदेश वाचावे म्हणजे त्यांच्या ज्ञानात भर पडेल


दरम्यान, या पुस्तकावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांना काही दिवसात समजेल की किती लोक हे पुस्तक वाचतात. प्रत्येक गोष्टीचा माझ्याकडे रेफरन्स आणि पुरावा आहे. हे पुस्तक लिहायला मला वेळ लागला. आता पुस्तक तयार झाल्यावर मार्केटमध्ये आणलंय.- निवडणुकीची घाई असल्यामुळे प्रकाशन न करता थेट मार्केटमध्ये पुस्तक आणलं आहे,असेही अनिल देशमुख म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टाचे आदेश वाचावे त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल. जस्टीस चांदीवाल समितीने जो अहवाल दिला, त्यामध्ये सांगितलेला आहे की अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप झाले त्या आरोपात काही तथ्य नाही. हा हायकोर्टाचा आदेश आहे आणि जस्टीस चांदीवाल समितीचाही तो आदेश आहे. असेही ते म्हणाले.


काटोलमधून मी किंवा सलील देशमुख फॉर्म भरू शकतात


महाविकास आघाडीच्या बाबतीत आता 90-90-90 असा फॉर्मुला ठरलेला आहे. मित्र पक्ष ज्यात समाजवादी पार्टी, शेकाप, सीपीआय, सीपीएम यांच्यासाठी जागा सोडण्याची चर्चा करू. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. 180 च्या वर आमच्या महाविकास आघाडीच्या जागा जिंकू. दरम्यान, काटोलची निवडणूक हे अनिल देशमुखांनी लढायची की सलील देशमुखांनी, याबाबत आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय. येथे अनिल देशमुख किंवा सलील देशमुख फॉर्म भरू शकतात. प्रचार आमच्या दोघांच्याही गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे. मात्र, कार्यकर्ते,पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांची मत जाणून घेऊ. प्रतिस्पर्धी कोणी राहील तरी काही फरक पडत नाही. ए लढणार कि बी लढणार हे पाहू. असेही अनिल देशमुख म्हणाले.


हे ही वाचा