मुंबई : महायुतीचा महापौर व्हावा हे वरच्या देवाच्याच मनात आहे, त्यामुळे शिंदे साहेब आणि आपण एकत्र बसून चर्चा करू आणि मुंबई चांगल्या पद्धतीने चालवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आता कुठलीही पळवापळवी नाही, त्याची आवश्यकताही नाही असंही ते म्हणाले. तसेच दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे राज ठाकरे यांना मोठा फटका बसणार असं आपण आधीच सांगितलं होतं असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईसह पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. मुंबईमध्ये महायुतीचे 118 नगरसेवक निवडून आले आहेत. आता पुढची चर्चा शिंदेंसोबत एकत्र बसून करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आम्हाला पूर्ण बहुमत मिळालं आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये कुणालाही मिळाल्या नाहीत. वरच्या देवानेच ठरवलं आहे, महायुतीचा महापौर करायचा. त्यामुळे मुंबईत महायुतीचाच महापौर होणार. शिंदे साहेब आणि आम्ही एकत्र बसून सगळं ठरवू आणि मुंबई चांगल्या पद्धतीने चालवू."
पळवापळवीची आवश्यकता नाही
मनसेला जास्त यश मिळेल असं मला आधीच वाटलं नव्हतं. दोन्ही ठाकरे बंधूंच्या या युतीचा राज ठाकरे यांना फटका बसला आहे. तर उद्धव ठाकरे यांना त्याचा फायदा झाला आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांचे नगरसेवक हे एका हॉटेलमध्ये ठेवले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही जसं आमच्या नगरसेवकांना एकत्र बोलावलं तसं शिंदेंनीही केलं असेल. आता आम्हाला पळवापळवीची गरज नाही, त्यामुळे तसं काही होणार नाही असंही ते म्हणाले.
पुण्यातील जनता दादा
पुण्याचे दादा कोण असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्यातील जनताच दादा आहे. तसेच आमचे दोन्ही नेते, मुरलीधर मोहोळ आणि महेश लांडगे यांना कुणाकडेही तक्रार करण्याची गरज नाही. ते दोन्ही नेते सक्षम आहेत.
जे मोदींसोबत आहेत त्यांच्यासोबत जनतेने जायचं ठरवलं, त्यामुळेच महायुतीला मोठं यश मिळालं आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ही बातमी वाचा: