Maharashtra Assembly Elections 2024 नागपूर : नागपूरच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करत संविधान चौकातून ते आपला नामांकन अर्ज भरण्यासाठी रॅली काढणार आहेत. त्यानंतर ते तहसील कार्यालयात जात आपला अर्ज सादर करणार आहेत. याबबात बोलताना हा विजयाचा शंखनाद असेल अशी प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीसांनी आपल्या विजयाचा विश्वास बोलून दाखवला आहे. 


दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवारी अर्ज दाखल करत असताना एक्सवर देखील त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. एक्सच्या ट्रेंडवर #DevaBhau चा जोरदार ट्रेंड असल्याचे समोर आले आहे. राजकीय ट्रेंडमध्ये #DevaBhau देशात पहिल्या क्रमांकावर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्ज दाखल करताना सोशल मीडियावर देवाभाऊ ट्रेंड चा जोरदार बोलबाला असल्याचे पुढे आले आहे.


आजचा शंखनाद म्हणजे विजयाचा शंखनाद - देवेंद्र फडणवीस


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक घोषित होताच "शंखनाद" हा एक शब्द ट्विट केला होता. दरम्यान आज ते नामांकन अर्ज भरण्यासाठी जात असताना प्रचार रथावर तोच शंखनाद शब्द लिहिलेला आहे. "भाजप महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे" अशा स्लोगनसह हा रथ तयार करण्यात आला आहे. आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत संविधान चौकातून देवेंद्र फडणवीस आपला नामांकन अर्ज भरण्यासाठी रॅली काढणार आणि त्यानंतर तहसील कार्यालयात अर्ज सादर करणार आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि फडणवीस हे तिघे एका गाडीतून निघाले आहे.


यापूर्वी गडकरी दंपति आणि फडणवीस दंपत्ती मध्ये नागपूर संदर्भात मनमोकळी चर्चा झाली. दरम्यान  याबबात बोलताना हा विजयाचा शंखनाद असेल अशी प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीसांनी आपल्या विजयाचा विश्वास बोलून दाखवला आहे. देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्या संदर्भातली रॅली आकाशवाणी चौकावर पोहोचली आहे. यावेळी आकाशवाणी चौकावर एक छोटी सभा होईल. या सभेत गडकरी आणि फडणवीस यांचे भाषण होणार आहे. यावेळी ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. 


आपल्यापेक्षा आपले काम बोलतं आहे- देवेंद्र फडणवीस


आपल्यापेक्षा आपले काम बोलत आहे. म्हणून आज जास्त बोलायची गरज नाही. गडकरींच्या नेतृत्वात आपण नागपुरात केलेला बदल लोक आज डोळ्यांनी पाहत आहेत. गेल्या दहा वर्षात आम्हाला साडेसात वर्षे मिळाले, आमच्या साडेसात वर्षाचा काळ आणि त्यापूर्वीचा पंधरा वर्षाचा काळ (महाआघाडीचा सरकार) तुलना करा. तुमच्या आशीर्वादानेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री होते आले. मोदींनी नवीन भारताची निर्मिती सुरू केली आहे आणि त्यांचे नेतृत्वात आम्ही नवीन महाराष्ट्राची निर्मिती सुरू केली आहे. असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.  
     


हे ही वाचा